Saturday, April 3, 2010

सुनील गावस्कर

१९७१ साल, वेस्ट इंडिजमध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिका चालू होती. त्या वेळी भारतीय संघात एक सर्वात लहान वयाचा खेळाडू - ज्याने आंतरशालेय, विद्यापीठ, रणजी अशा विविध स्तरांवरील क्रिकेट सामन्यांमध्ये धावांचे डोंगर रचले होते-विंडिजच्यां तोफखान्यासारख्या भासणार्‍या, अक्षरश: आग ओकणार्‍या गोलंदाजांसमोर खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करत असताना या मालिकेतील त्या खेळाडूचा खेळ क्रिकेट रसिकांना थक्क करून सोडणारा होता. संपूर्ण मालिकेत १ द्विशतक आणि ३ शतके यांच्या साहाय्याने १५४.८० च्या सरासरीने एकूण ७७४ धावांचा पर्वत या खेळाडूने रचला. त्याच्या या कामगिरीमुळे भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांच्या भूमीत सामना जिंकला, मालिकाही (१-०) जिंकली. पुढे जाऊन याच क्रिकेटपटूने क्रिकेटच्या इतिहासात आपले एक वेगळे, उच्चतम स्थान निर्माण केले. त्या खेळाडूचे नाव सुनील मनोहर गावस्कर.

लिटिल मास्टर या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुनील गावस्कर यांचा जन्म १९४९ मध्ये झाला. सुनील गावस्कर यांच्या घरातील वातावरण क्रिकेटमय होते. त्यांचे वडील स्वत: एक क्रिकेटपटू होते. मामा माधव मंत्री हेदेखील एक चांगले कसोटी खेळाडू होते. सुनील यांच्या आईने तर त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. एकंदरीत घरातील क्रिकेटने भारलेले वातावरण सुनीलमध्ये दडलेल्या खेळाडूला जागवण्यात महत्त्वाचे ठरले.
१९७० साली सुनील यांची निवड रणजीसाठी झाली. या वेळी पहिल्या दोन डावात त्यांच्याकडून विशेष कामगिरी होऊ शकली नाही. परंतु तिसर्‍या डावात अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत, प्रभावी फिरकी गोलंदाजासमोर त्यांनी शतकी कामगिरी केली. १९७१ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत देण्यात आलेल्या संधीचे त्यांनी सोने केले. याच मालिकेतील एका सामन्यात पहिल्या डावात शतक व दुसर्‍या डावात द्विशतक करणारा  दुसरा खेळाडू होण्याचा बहुमान त्यांनी प्राप्त केला.

१९७५ ते १९८६ हे सुनील गावस्कर यांनी गाजवलेले दशक. त्यांच्या पूर्ण १७ वर्षांच्या प्रदीर्घ क्रिकेट कारकीर्दीत ह्या दशकात त्यांच्या कामगिरीचा आलेख नेहमी चढता राहिला. या कालावधीत सातत्याने आत्मपरीक्षण करत त्यांनी क्रिकेटबाबत स्वत:चे असे शास्त्रशुद्ध तंत्र विकसित केले. वेगवेगळ्या देशातील हवामान आणि खेळपट्टी यांचा अभ्यास करून, त्याप्रमाणे खेळाचे नियोजन केल्यामुळे परदेशातील खेळपट्‌ट्यांवरदेखील त्यांनी उच्च दर्जाचा खेळ केला. हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

मार्शल, होल्डिंग, गार्नर... यांसारख्या गोलंदाजांचा काळ असतानासुद्धा सुनील यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत कधीही शिरस्त्राणाचा (हेल्मेटचा) वापर केला नाही. यावरून त्यांची अचूकता, हात-डोळे यांचा समन्वय; (Hand-Eye co-ordination) आणि त्यांचा आत्मविश्वास याची आपल्याला कल्पना येते.

कमालीची एकाग्रता, घोटलेले तंत्र, चिवटपणा (तासन्‌तास, दिवसेंदिवस खेळपट्टीवर उभे राहण्याची क्षमता), उत्कृष्ट संरक्षण (डिफेर्न्स), क्रीझचा उत्तम वापर आणि आघाडीचा तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून विशेष कामगिरी ही त्यांच्या खेळाची प्रमुख वैशिष्ट्ये होत. त्यांचा १०१२२ धावांचा (कसोटीतील सर्वोच्च) विक्रम आणि कसोटीतील सर्वाधिक-३४- शतकांचा विक्रम प्रदीर्घ काळ अबाधित राहिला. त्यांच्या एकूण ३४ कसोटी शतकांपैकी सर्वाधिक १३ शतके ही त्या काळात सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांसह आघाडीवर असणार्‍या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध काढलेली आहेत हे विशेष महत्त्वाचे! आजही परदेशातील मैदानांवर भारताची कामगिरी पाहिली, तर असे लक्षात येते की आपल्याला सामने अनिर्णित राखण्यासाठी झगडावे लागते; विजय दुर्मीळ असतात. सौरव गांगुली, महेंद्रसिंह ढोणी यांच्या काळात याबाबत बदल झाले, होत आहेत. पण बदलांचा पाया सुनील गावस्कर यांनी घातला. त्यांच्या ३४ कसोटी शतकांपैकी १८ शतके ही परदेशी मैदानांवर ठोकलेली आहेत, ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे.

प्रथम श्रेणी सामन्यांतील त्यांच्या २५८३४ धावा  धावांची भूक व त्यानुसार कामगिरी दर्शवतात. एक आदर्श ‘स्लीपमधील क्षेत्ररक्षक’ असाही त्यांचा आदराने उल्लेख केला जातो. त्या काळात एकदिवसीय सामन्यांचे स्वरूप आजच्याइतके वेगवान नव्हते. विश्र्वचषक स्पर्धांचे आयोजन होत असे, पण संघ ५० (किंवा ६०) षटकांत २२५-२५० धावांत समाधान मानत असत. सुनील गावस्कर निवृत्त होत असताना एकदिवसीय सामन्यांचे स्वरूप पालटत होते. १९८७ मध्ये त्यांनी नागपूरच्या मैदानावर न्युझीलंडविरुद्ध ८८ चेंडूत १०३ धावा ठोकल्या होत्या. या खेळीतून त्यांनी आपले एकमेव एकदिवसीय शतक साकारले आणि आपण क्रिकेटच्या ‘या’ प्रकारातही किती उच्च दर्जा गाठू शकतो, याची झलक त्यांनी दाखवली. १९८३ च्या विश्र्वचषक विजेता भारतीय संघाचे ते महत्त्वाचे सदस्य तर होतेच.

जागतिक पातळीवर भारतीय क्रिकेटला मान्यता आणि भारतीय खेळाडूंना आत्मविश्वास मिळवून देण्याचे श्रेय सुनील गावस्कर यांच्याकडे जाते. कप्तानपदी असताना हूक, पुल यासारख्या आवडत्या फटक्यांना नियंत्रित ठेऊन, योजनाबद्ध रीतीने भारतीय संघाला संकटातून बाहेर काढण्याची कामगिरी त्यांनी अनेक वेळा पार पाडली. त्याचबरोबर विजय हजारे, मांजरेकर यांच्या परंपरेतील तंत्रशुद्ध खेळ विकसित करून त्यास सातत्याची जोड दिली. कसोटी क्रिकेटमध्ये (विशेषत: परदेशात) पराभवाची नामुष्की पत्करण्याची सवय झालेल्या भारतीय संघास पराभव टाळण्याचे व जिंकण्याचे सामर्थ्य त्यांनी आपल्या खेळाच्या साहाय्याने प्रदान केले. भारतीय क्रिकेटपटूंमध्ये व्यावसायिकता आणण्याचे कामही गावस्कर यांनी पार पाडले.
‘हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला’ या त्यांनी गायलेल्या गाण्यातील शब्द ते स्वत: जगले, जगत आहेत. एक यशस्वी खेळाडू म्हणून अजून अधिक काळ खेळू शकत असूनदेखील कुठे थांबायचे हे माहीत असल्यामुळे  १९८७ साली गावस्करांनी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली.
निवृत्तीनंतरही स्तंभलेखक, उत्कृष्ट क्रीडा समीक्षक आणि समालोचक या नात्याने ते क्रिकेटशी संबंध जोडून आहेत. तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटविषयक विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्य म्हणूनही ते कार्य पाहत आहेत. आपल्या सफाईदार भाषाशैलीने क्रिकेट समालोचनाच्या क्षेत्रात स्वत:चे असे उच्च स्थान त्यांनी निर्माण केले आहे. सुनील स्वत: एक तंत्रशुद्ध खेळाडू असल्याने त्यांना खेळातले बारकावे माहीत आहेत. खेळाचे विश्र्लेषण ते अतिशय समर्पक शब्दांत, आकर्षक व नेमक्या पद्धतीने करतात. त्यामुळे कित्येकदा खेळ पाहावा की केवळ समालोचन ऐकत राहावे असा प्रश्र्न क्रीडारसिकांसमारे उभा राहतो. त्यांच्या ओघवत्या, समृद्ध अशा इंग्रजी भाषेच्या साहाय्याने त्यांनी या क्षेत्राला एक वेगळे परिमाण प्राप्त करून दिले आहे.

क्रिकेटबरोबरच सुनील गावस्कर यांनी लेखनकला देखील चांगल्या रीतीने अवगत केलेली आहे. ‘सनी डेज’ या त्यांच्या आत्मचरित्राबरोबरच त्यांनी वन-डे-वंडर्स, रन्स अॅन्ड रुईन्स ही पुस्तकेही लिहिली आहेत. या पुस्तकांचे मराठी भाषांतरदेखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर जगातील काही मोजक्या क्रिकेटपटूंच्या खेळांचे वर्णन करणारे ‘आयडॉल्स’ हे पुस्तकही त्यांनी लिहिलेले आहे. ते अतिशय नेमकेपणाने व समर्पकतेने विविध वृत्तपत्रांत स्तंभलेखन करतात. स्तंभलेखक, समीक्षक, समालोचक या सर्व गुणांसह आणखी एक वेगळा गुण म्हणजे त्यांनी - शांताराम नांदगावकर लिखित ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला’ आणि ‘मित्रा तुला हे जग आहे फुलवायचे’ ही दोन - गायलेली गाणी. त्याचबरोबर त्यांनी ‘सावली प्रेमाची’ या चित्रपटात एक छोटीशी भूमिकादेखील केलेली आहे.

क्रिकेट जगतात उपखंडातील खेळाडू (भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगला देश) आणि इंग्लंड, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांचे खेळाडू यांच्यामध्ये नेहमीच शीतयुद्ध चालू असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, विविध संबंधित आंतरराष्ट्रीय समित्या यांमध्येही - अधिकार्‍यांत - हे शीतयुद्ध चालू असते. या परिस्थितीत उपखंडातील खेळाडूंचे प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष नेतृत्व सुनील गावस्कर तळमळीने करताना दिसतात. भारतीय किंवा उपखंडीय खेळाडूंवर जर अन्याय होत असेल, तर या खेळाडूंची न्याय्य बाजू गावस्कर नेहमीच हिरीरीने मांडतात. या त्यांच्या कृतीतून भारताबद्दलचा अभिमान दिसून येतो.
क्रिकेट समालोचक, समीक्षक आणि अनुभवी खेळाडू या नात्याने आजही ते नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करत असतात. अशा या हरहुन्नरी  विक्रमवीराचे नाव भारतीय क्रिकेट जगतात नेहमीच अभिमानाने घेतले जाईल.

सुनील गावस्कर यांच्या नावावरील विक्रमांचा तपशील व अन्य माहिती -
-    आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारा १ ला फलंदाज.
-    सर डॉन ब्रॅडमन यांचा कसोटी क्रिकेटमधील २९ शतकांचा विक्रम मोडला. हा विक्रम करण्यास ब्रॅडमन यांना ५२ सामने खेळावे लागले तर आपल्याला ९५ सामने खेळावे लागले याची गावस्कर प्रांजळपणे कबुली देतात. या २९ शतकांमध्ये ३ द्विशतकांचा समावेश असून नाबाद २३६ हा वैयक्तिक उच्चांक आहे.

उषःकाल होता होता काळरात्र झाली !

उषःकाल होता होता काळरात्र झाली !
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्यांची वाट का पहावी ?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !
तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तोच दंश करिती आम्हा साप हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !
तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
आम्हावरी संसारची उडे धूळमाती !
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली !
अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली !
उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला !
कसे पुण्य दुर्दैवी अन्‌ पाप भाग्यशाली !
धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळली !

गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर 
स्वर - आशा भोसले, रवींद्र साठे
चित्रपट - सिंहासन (१९७९)

तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल

तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल
नका सोडुन जाऊ, रंगमहाल
पापण्यांचि तोरणं बांधुन डोळ्यांवरती
ही नजर उधळिते काळजातली पिर्ती
जवळी यावं, मला पुसावं, गुपीत माझं खुशाल
हुरहुर म्हणुं की ओढ म्हणू ही गोड
या बसा मंचकी, सुटंल गुलाबी कोडं
विरह जाळिता मला रात ही पसरी मायाजाल
लाडे-लाडे अदबिनं तुम्हा विनविते बाई
पिरतिचा उघडला पिंजरा तुमच्या पायी
अशीच ऱ्हावी रात साजणा, कधी न व्हावी सकाळ

गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - राम कदम
स्वर - उषा मंगेशकर
चित्रपट - पिंजरा (१९७२)

कशी नशीबाने थट्टा आज मांडली

दहा दिशांनी, दहा मुखांनी, आज फोडिला टाहो,
आसवांत या भिजली गाथा, श्रोते ऐका हो !
माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
गंगेवानी निर्मळ होतं, असं एक गाव
सुखी समाधानी होतं, रंक आणि राव
त्याची गुणगौरवानं किर्ती वाढली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
अशा गावि होता एक भोळा भाग्यवंत
पुण्यवान म्हणती त्याला, कुणी म्हणे संत
त्याला एका मेनकेची दृष्ट लागली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
सत्वशील चारित्र्याची घालमेल झाली
गावासाठी नर्तकीला, नदीपार केली
नार सूड भावनेनं, उभी पेटली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
पिसाळलेल्या नागिणीने थयथयाट केला
नाचगाण्यासाठी सारा गाव येडा झाला
त्यांनी लाज भीड निती सारी सोडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
जाब विचाराया गेला, तिने केला डाव
भोवऱ्यात शृंगाराच्या सापडली नाव
त्याच्या पतंगाची दोरी तिने तोडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
खुळ्या जीवा कळला नाही, खोटा तिचा खेळ
तपोभंग झाला त्याचा पुरा जाई तोल
त्याला कुत्र्या-मांजराची दशा आणली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
जन्मभरी फसगत झाली, तिचा हा तमाशा
जळुनिया गेली आता जगायाची आशा
आज हुंदक्यानं भैरवी मी गायिली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
याची देही याची डोळा पाहिले मरण
मीच माझ्या हाती देवा रचिले सरण
माझ्या कर्मसोहळ्याची यात्रा चालली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !

गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - राम कदम
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - पिंजरा (१९७२)

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
माझ्या पिरतीची रानी तू होशील काय ?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय !
तुझ्या पिरतीची रानी मी होणार नाय !
गं तुझं टप्पोरं डोलं, जसं कोल्याचं जालं
माझं कालिज भोलं, त्याच मासोली झालं
माझ्या पिरतीचा, सुटलाय तुफान वारा वारा वारा
रं नगं दावूस भलताच तोरा, जा रं गुमान साळसूद चोरा
तुझ्या नजरंच्या जादूला, अशी मी भुलणार नाय
रं माझ्या रूपाचा ऐना, तुझ्या जीवाची दैना
मी रे रानाची मैना, तुझा शिकारी बाणा
खुळा पारधी गं, जाळ्यामंदी आला आला आला
गं तुला रुप्याची नथ मी घालीन
गं तुला मिरवत मिरवत नेईन
तुज्या फसव्या या जाल्याला, अशी मी गावनार नाय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार ......हाय !
तुझ्या पिरतिचि रानी मी होनार हाय !

गीत - सुधीर मोघे
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - आशा भोसले, हेमंत कुमार
चित्रपट - हा खेळ सावल्यांचा (१९७६)

जिजाबाई

जिजाबाई (१५९४-१६७४) ही सिंदखेडच्या लखुजी जाधवांची कन्या. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. ई.स. १६०५ मध्ये जिजाबाई आणि शहाजीराजांचा विवाह झाला. पुढे लखुजी जाधव व शहाजी राजे यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला असता, जिजाबाई आपल्या पतीशी कायम एकनिष्ठ राहिल्या. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती

संस्कृतीची जोपासना

महाराष्ट्राची म्हणून एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. संस्कृती म्हणजे जगण्यासाठीची मूल्ये, आचरणाचे नियम, रूढी, चाली-रीती, व्यवहार, आपली भाषा, सण, उत्सव, इतिहास, भौगोलिक परिस्थिती, थोर व्यक्ती, परंपरा यांतून संस्कृती प्रत्येक नव्या पिढीकडे पोहोचते. बदलत्या काळाप्रमाणे येणार्‍या पिढीला त्यात काही फेरफार करावे लागतात, पण वागण्याचे नियम-मूल्ये यात मात्र मोठे बदल होत नाहीत. सण-उत्सव, प्रथा, परंपरा या एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला वारशाने समजतात. त्याविषयीचे वाचन, अभ्यास औपचारिकपणे सर्व जण करत नसले, तरी मौखिक परंपरेने, अनुकरणाने, निरीक्षणाने त्या वर्षानुवर्षे सुरूच राहतात.

मुख्यत: शेतीप्रधान संस्कृती व ग्रामीण भागात वास्तव्य करणारी लोकसंख्या महाराष्ट्रात अधिक आहे. निसर्गाशी अगदी जवळचा संबंध असणारे कष्टकरी अत्यंत देवभोळे, श्रद्धाळू, पापभिरू असल्याने बर्‍याच व्रत-वैकल्यांत आणि उपचारांत समाधान व आनंद मानणारे आहेत. तसेच शिक्षित समाजही रूढी, परंपरा, सण-उत्सव यात कसा वेळ देतो, का वेळ देतो हेही समजून घेण्याजोगे आहे.

दैनंदिन कामातून थोडे वेगळे होऊन; नातलग, शेजारी, गावकरी, सहकारी यांच्या सोबतीने एकत्र येऊन आनंद साजरा करणे, या हेतूने महाराष्ट्रात अनेक उत्सव, सण साजरे केले जातात. हवामान, ऋतू आणि त्या-त्या ऋतूत असणारी फळे, फुले, झाडे, त्यांचा औषधी उपयोग याचा अभ्यास करून पूर्वापार हे सण-उत्सव, व्रतं पाळली जातात. आयुर्वेद-औषधी शास्त्र हे अतिशय प्रगत शास्त्र म्हणून उपयोगात आणले जात होते असेही त्यावरून लक्षात येते. वनौषधी, फुले ऋतूमानाप्रमाणे उगवतात व कोमेजतात. आपल्या सणावारात ऋतूमानाप्रमाणे येणार्‍या पिकांचाही फार विचार केलेला आहे असे लक्षात येते.

आचरणाचे नियम हेदेखील त्यामुळे निसर्गातील बदलांचा विचार करून ठरवलेले आहेत. आपल्या आहारात कोणते घटक केव्हा यावेत, कसे यावेत याचा अभ्यास पूर्वीपासून होत असावा. त्यामुळे बदलत्या हवेनुसार सणांना करण्याचे पदार्थही त्यादृष्टीने ठरवलेले आहेत. या अर्थाने खाद्यसंस्कृतीही सण-उत्सवांशी जोडल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

पारंपरिक पद्धतीने आज सण सर्वत्र साजरे होत नाहीत. त्यात व्यावहारिक अडचणीही आहेत. तरीही महाराष्ट्रात सण-उत्सव धार्मिक पद्धतीने साजरे करणे, लोकांनी एकत्र येण्यासाठीचे माध्यम म्हणून आजही सुरू आहे. महाराष्ट्रातून इतर राज्यांत, देशांत जाणारे लोक त्यांच्यासोबत त्या पद्धती घेऊन जातात. त्यामुळे अनेक मराठी सण-उत्सव जगाच्या कानाकोपर्‍यातही साजरे होतात असे दिसते.

जाती-धर्मात विभागलेल्या आपल्या समाजाला भेद-भाव विसरून एकत्र येण्यासाठी काही उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरे करण्याची पद्धत आपल्या समाजसुधारकांनी शिकवली. उत्सवांचा समाज प्रबोधन करण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम म्हणून वापर समाजसुधारकांनी केला.

काही धार्मिक चालीरिती लोकांत भेदभाव करणार्‍या, अंधश्रद्धा पसरवणार्‍या असल्याचे पाहून संतांनी एक प्रबोधनाची चळवळ महाराष्ट्रात सुरू केली. संत ज्ञानेश्र्वर,
संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत गोरोबा,संत चोखामेळा, संत मुक्ताबाई,संत जनाबाई, समर्थ रामदास यांनी समाजाला एकत्र येण्याची, भेदभाव विसरण्याची, समानतेची शिकवण दिली. काही उत्सव सामान्य जनतेला चांगल्या मार्गाने जगण्याची शिकवण देण्यासाठी, नीतीनियमांनी समाजाला बांधून ठेवण्यासाठीही सुरू केले. शिक्षणाने, विज्ञानाच्या प्रसार-प्रचारामुळे काही सण, उत्सव, चालीरिती यांचे स्वरूप आधुनिक काळात बदलत आहे. त्यात असणार्‍या अंधश्रद्धांना वगळून सण वा उत्सव साजरे व्हावेत, व्रतं पाळली जावीत हीच संतांचीही प्रबोधनाची चळवळ होती.

महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संतांमुळे आजही अनेक राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील सांस्कृतिक वातावरण निराळे आहे. त्याला अध्यात्माची, तत्त्वज्ञानाची, इतिहासाची आणि मानवजातीच्या कल्याणाची सांगड घालून आपले सण-उत्सव साजरे करण्याची प्रथा आहे. मानवाच्या कल्याणाचे, त्याच्या प्रगतीचे बीज घराघरात पोहोचवण्याचे काम त्यामुळे संस्कृतीच्या माध्यमातून होते असे दिसते.

‘संस्कृती’ या शब्दाला आलेला सध्याचा अर्थ फार वरवरपणे व्यवहारात वापरला जातो आहे. पण मुख्यत: उन्नत समाजासाठी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होण्यासाठी आणि व्यापक समाजहितासाठी असलेले आचार-विचार-विहाराचे व्यक्तीसाठीचे नियम, शिष्टाचार यांसाठी वापरलेला शब्द म्हणजे ‘संस्कृती’.

आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत आपले सणवार, व्रतं आणि उत्सवदेखील ऋतुमानाप्रमाणे - सूर्य-चंद्र-ग्रहस्थितीच्या अनुसार -ठरलेले आहेत. मराठी दिनदर्शिकेनुसार ग्रहस्थितीप्रमाणे - पृथ्वी आणि इतर ग्रहांच्या स्थानाप्रमाणे - कालमापनाच्या पद्धती ठरल्या. त्याप्रमाणे तिथीला मराठी दिनदर्शिकेत महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक सण-दिवस हे तिथीनुसार ठरलेले दिवस - तेही निसर्गावर आधारित असेच आहेत.


भारतात कालमापनासाठी फार पूर्वापार चालत आलेली पंचांग पद्धती आजही उपयोगात आणली जाते. धर्मशास्त्रांसंदर्भातील ग्रंथांतून त्याबद्दलचे संदर्भ सापडतात. सण-उत्सव हे त्या पंचांगानुसार ठरवण्याची प्राचीन पद्धत आहे. पूर्वी मोजक्या शिक्षित - ब्राह्मण जातीच्या लोकांपुरते असलेले हे ज्ञान आता शास्त्ररूपात, गणिती पद्धतीने सर्वच लोकांसाठी खुले आहे. त्यानुसार सण-उत्सव ठरून ते छापील पद्धतीने सर्वांसाठी उपलब्ध असतात. २७ नक्षत्रे, १५ तिथी, ७ वार, २७ योग असे पंचांग भारतात इसवीसनपूर्व ४०० वर्षांपासून प्रचलित असावे असे संदर्भ मिळतात. 

लता मंगेशकर

लता मंगेशकर (जन्म: सप्टेंबर २८, १९२९) भारताच्या महान गायिका आहेत. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. संगीत-विश्वात त्यांना 'लता-दीदी' म्हणून ओळखले जाते. लता-दीदीच्या कारकीर्दीची सुरूवात १९४२ मध्ये सुरू झाली आणी सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, इतर वीस वर प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता-दीदींचा परिवार संगीतासाठी प्रसिद्ध असून, त्यांच्या भावंडांमध्ये सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणी ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर समाविष्ट आहेत. लता-दीदींचे वडील मास्टर दिनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

भारताचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' प्राप्त होणार्‍या गायक-गायिकांमध्ये लता-दीदींचे नाव दुसर्‍या क्रमांकावर आहे.

लता-दीदींचे नाव 'गिनेस बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये १९७४ ते १९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नमूद आहे.

बालपण
लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजंसी) च्या इंदोर शहरात शीख मोहल्ला येथे एका महाराष्ट्रीय कुटुंबात झाला. त्यांचे पाळण्यातले नांव हृदया. त्यांचे वडील पंडित दिनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलाकार होते.गणेश भट अभिषेकी हे कर्‍हाडे ब्राह्मण त्यांचे पिता. त्यांच्या मातोश्री, शुद्धमती ह्या मा. दिनानाथांच्या द्वितीय पत्नी होत्या. कुटुंबाचे आडनाव हर्डीकर होते; दिनानाथांनी आपले मूळ गाव मंगेशी - (गोवा) वरून आडनाव मंगेशकर असे बदलले. लता-दीदी आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणी हृदयनाथ ही त्यांची लहान भावंड.

लताला पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्याच वर्षी तिने वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरूवात केली. वडिलांच्या गायनाचा आणी धड्यांचा तिच्यावर ठसा उमटला.

चित्रपटसृष्टीत १९४० च्या दशकात सुरूवातीची कारकीर्द
१९४२ मध्ये लता-दीदी अवघ्या १३ वर्षांच्या होत्या, तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक - मास्टर विनायक ह्यांनी लता-दीदींच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लता-दीदींना गायिका आणी अभिनेत्री म्हणून कामाची सुरूवात करून दिली.

लता-दीदीने नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हसाल (१९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी लतादीदींना नवयुगच्या पहिली मंगळागौर (१९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भुमिका दिली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लतादीदीही मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ(भेंडीबाजारवाले) ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (१९४६) ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले (दत्ता डावजेकर हे त्या गाण्याचे संगीतकार होते). लता आणी आशा (बहिण) यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात (बडी माँ - १९४५) नूर जहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात लतादीदीने माता तेरे चरणोंमें हे भजन गायले. मास्टर विनायकांच्या दुसर्‍या हिंदी चित्रपटाच्या (सुभद्रा - १९४६) ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लतादीदीची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली.

१९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवालेंनी नवनिर्मीत पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी उस्ताद अमानत खाँ(देवासवाले) यांचेकडून शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडून ही दीदींना तालीम मिळाली.

१९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लताजींचे मार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूर जहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई(अंबालेवाली), ह्यांसारख्या अनुनासिक आणी जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या.

ग़ुलाम हैदरांनी लताजींची ओळख तेव्हा शहीद (१९४८) ह्या हिंदी चित्रपटावर काम करी असलेले निर्माते शशाधर मुखर्जींशी केली, पण मुखर्जींनी लताचा आवाज "अतिशय बारीक" म्हणून नाकारला. तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते - येणार्‍या काळात निर्माते आणी दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणी आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. हैदरांनी लतादीदींना मजबूर (१९४८) ह्या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली.

सुरूवतीला लता आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूर जहाँचे अनुकरण करीत असे, पण नंतर लतादीदीने स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लीम कवी असत, त्यामुळे गाण्यांच्या भावकाव्यात भरपूर हिंदुस्तानी शब्द असत. एकदा सुप्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार कडून लतादीदीला हिंदी/हिंदुस्तानी गाण्यातील "मराठी" उच्चारांसाठी हलकी अस्विकृती दाखवणारा शेरा मिळाला, तेव्हा लताने शफ़ी नावाच्या मौलवींकडून हिंदुस्तानी उच्चारांचे धडे घेतले.

लोकप्रिय चित्रपट महल (१९४९) चे आयेगा आनेवाला हे गाणे लताच्या कारकीर्दीला एक महत्वाचे वळण देणारे ठरले. (गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे अभिनेत्री मधुबाला ने म्हटले होते.)

 १९५० च्या दशकात उत्कर्ष
१९५० च्या दशकात लताने ज्या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायिली, अशा नामांकित संगीतकरांची नावे - अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, नौशाद, सचिन देव बर्मन, सी. रामचंद्र, हेमंत कुमार, सलिल चौधरी, खय्याम, रवी, सज्जाद हुसेन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, वसंत देसाई, सुधीर फडके, हंसराज बहल आणी उषा खन्ना. (सुप्रसिद्ध संगीतकार ओ.पी. नय्यर हे असे एकमेव अपवाद होते ज्यांनी आपल्या रचनांसाठी लताऐवजी आशा भोसलेना जास्त प्राधान्य दिले.)

संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखाली बैजु बावरा (१९५२), मुग़ल-ए-आज़म (१९६०) आणी कोहिनूर (१९६०) ह्या चित्रपटांसाठी लताने शास्त्रोक्त संगीतावर आधारित काही गाणी गायिली. लताने नौशादांसाठी गायिलेले पहिले गाणे हे जी.एम.दुर्राणींसोबतचे द्वन्द्वगीत छोरेकी जात बडी बेवफ़ा आहे. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी शंकर-जयकिशन यांनी तर आपल्या जवळजवळ सर्व चित्रपटांच्या(विशेषतः राज कपूर च्या ) गाण्यांच्या गायिका म्हणून लतादीदींचीच निवड केली. अशा चित्रपटांमध्ये आग, आह, (१९५३), श्री ४२० (१९५५) आणि चोरी चोरी (१९५६) यांचा समावेश आहे. १९५७ पर्यंत सचिन देव बर्मन आपल्या बहुतेक चित्रपटगीतांच्या प्रमुख गायिका म्हणून लतादीदीचीच निवड करीत, उदा. सज़ा (१९५१), हाउस नं. ४४, (१९५५) आणी देवदास (१९५५). पण १९५७ ते १९६२ च्या काळात बर्मनदादांनी लतादीदी ऐवजी गीता दत्त आणी आशा भोसले ह्या गायिकांबरोबर आपली सर्व गाणी बसवली.

१९५० च्या दशकात लताबरोबर अतिशय लोकप्रिय गाणी बनवणार्‍यांपैकी एक सलिल चौधरी होते. लतादीदीला "सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका" म्हणून सर्वप्रथम फ़िल्मफ़ेयर पारितोषिक सलिल चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या आजा रे परदेसी ह्या मधुमती (१९५८) मधील गीतासाठी मिळाले.

१९६०चे दशक
१९६०च्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या. ह्या काळात लताने जवळजवळ सर्व संगीतकारांबरोबर गाणी ध्वनीमुद्रित केली, ज्यांपैकी अनेक गाणी अजरामर झाली. १९६० मध्ये प्यार कीया तो डरना क्या हे मुग़ल-ए-आज़म (१९६०) चे नौशादने संगीतबद्ध केलेले आणी मधुबालावर चित्रीत गाणे तुफान लोकप्रिय झाले. हवाई-धरतीचे अजीब दास्ताँ है ये हे शंकर-जयकिशन दिग्दर्शित आणी दिल अपना प्रीत पराई (१९६०) मध्ये मीना कुमारी वर चित्रीत गाणेही अतिशय प्रसिद्ध झाले.

१९६१ मध्ये लतादीदीने बर्मनदादांचे सहाय्यक जयदेव यांसाठी अल्ला तेरो नाम हे भजन गाण्याचे पाऊल उचलुन बर्मनदादांसोबत पुन्हा वाटचाल सुरू केली.

१९६२ मध्ये लताने बीस साल बाद चित्रपटातील कहीं दीप जले कहीं दिल ह्या हेमंत कुमार-दिग्दर्शित गाण्यासाठी दुसरे फिल्म फेअर पुरस्कार पटकावले.

२७ जून १९६३ ला, भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लतादीदीने कवी प्रदीप लिखीत आणी सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ऐ मेरे वतन के लोगों हे देशभक्तिगीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. तेव्हा लताच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणार्‍या जवानांना श्रद्धांजलि वाहणारे गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रु उभे झाले.

१९६३ मध्ये सचिन देव बर्मन बरोबर पुन्हा गाणे सुरू केल्यानंतर लतादीदीने गाईड (१९६५) मधील आज फिर जीनेकी तमन्ना है, पिया तोसे नैना लागे रे, गाता रहे मेरा दिल (किशोर कुमार सोबत युगलगीत) तसेच ज्वेल थीफ़ (१९६७) मधील होटोंपे ऐसी बात यांसारखी बर्मनदादांची अनेक लोकप्रिय गाणी म्हटली.

१९६० च्या दशकात लतादीदीने मदनमोहन ह्या आपल्या आवडत्या संगीतकाराची अनेक गाणी म्हटली. अशा गाण्यांमध्ये अनपढ (१९६२) चे आपकी नज़रोंने समझा, वो कौन थी (१९६४) ची लग जा गले, नैना बरसे तसेच मेरा साया (१९६६) चे तू जहां जहां चलेगा ह्या सुरेल गाण्यांचा विशेष उल्लेख होतो.

१९६० च्याच दशकात लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्या नवोदित संगीतकार-जोडीची जवळ-जवळ सर्व गाणी लतानेच म्हटली. लता मंगेशकरच्या गाण्यांमुळेच ही जोडी हिंदी चित्रपटसंगीत क्षेत्रात अजरामर झाली. पारसमणी (१९६३) ह्या लक्ष्मी-प्यारे जोडीच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटातली लताची गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. लतादीदीने मराठी सिनेमांसाठी अनेकानेक गाणी गायिली. त्यांनी ज्या नामांकित संगीतकारांबरोबर काम केले, त्यांमध्ये ह्रुदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभु, श्रीनिवास खळे आणी सुधीर फडकेंचा विशेष उल्लेख होतो. लतादीदीने स्वतः 'आनंदघन' ह्या उपनावाखाली मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत. १९६० आणी १९७० च्या दशकांमध्ये लताने संगीतकार सलिल चौधरी आणी हेमंतकुमारांची बांगला भाषेतली गाणीही म्हटली आहेत.

लता मंगेशकरने (मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी आणी किशोर कुमार यांसारख्या त्या काळातील सर्व प्रसिद्ध गायकांबरोबर युगलगीते गायिली आहेत.

अभिजात संगीतात उस्ताद आमिरखा आणि उस्ताद बडे गुलामअली हे त्यांचे आवडते गायक आहेत.

सचिन तेंडूलकर

गेली 20 वर्ष सतत धावांचा पाऊस पाडणारा सचिन रमेश तेंडुलकर याची प्रत्येक खेळी एक नवीन विक्रमास जन्म देते. विक्रम हा त्याच्या आयुष्याचा एक भाग आहे. यामुळे सचिन आणि विक्रम हे समीकरणही घट्ट जमले आहे. विक्रमादित्य सचिनने गुरुवारी (ता.पाच नोव्हेंबर 2009) पुन्हा एक विक्रम केला. 17 हजार धावा पूर्ण करुन त्याने आपल्या विक्रमात पुन्हा एकाने भर घातली. 17 हजार धावा करताना 175 धावांची सर्वोत्कृष्ट खेळी तो खेळला. क्रिकेटमधील असा फटका नव्हतो जो सचिनने या खेळी दरम्यान मारला नव्हता.

सचिनने 18 डिसेंबर 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पहिल्या एक हजार धावा त्याने 1992 मध्ये 36 व्या सामन्यातच पूर्ण केल्या. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. मजल, दलमजल करीत 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने दहा हजार धावा पूर्ण केल्या. त्यानंतर सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. त्या विक्रमापासून इतर फलंदाज खूप लांब आहे. आता तो विक्रमांचा एव्हरेस्टवर उभा राहिला आहे. भविष्यातही कोणत्याही खेळाडूंना त्याचा विक्रमाचा एव्हरेस्ट सर करणे अवघडच नाही तर अशक्य होणार आहे. सचिनच्या नावावर आज एकदिवसीय सामन्यात 45 तर कसोटी सामन्यात 42 शतके मिळून 87 शतके आहेत. एकूण 144 अर्धशतके त्याने केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 17,168 धावा झाल्या आहेत. तर कसोटीत 159 सामन्यात त्याने 12,773 धावा केल्या आहेत.एकूण 29,951 धावांवर तो नाबाद आहे. त्याच्या या विक्रमांपासून इतर खेळाडू खूप लांब आहेत.

गुरुवारी हैदराबादमध्ये खेळताना तो दणक्यात खेळला. त्याचा फटक्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. परंतु त्याच्या विक्रमाबरोबर भारत सामना जिंकला असता तर दुधात केशर पडल्याचा आनंद त्याच्यासह सर्वांना झाला असता. सतरा हजाराच्या या टप्प्याने सचिनला याआधीही अनेकदा हुलकावणी दिली होती. चॅंपियन्स चषक स्पर्धेत पाकविरुद्धच्या सामन्यात सचिन लवकर बाद झाला नसता, तर त्या वेळीच हा पल्ला त्याला गाठता आला असता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पुढील सामना पावसामुळे रद्द झाला, तर वेस्ट विंडीजविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो हॉटेलच्या खोलीत कोसळल्याने सामना खेळू शकला नव्हता. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरल्याची टीका होण्यापूर्वी त्याने आपल्या बॅटने उत्तर दिले. कारण यापूर्वी त्याची खेळी 18 (बडोदा), 4 (नागपूर) 32 (दिल्ली) 40 (मोहाली) अशी झाली होती. दिल्लीच्या सामन्यात तो धावचित झाला होतो तर मोहालीत पंच अशोक डिसिल्व्हाच्या चुकीच्या निर्णयाचा तो बळी ठरला. (डिसिल्व्हा आणि बकनर हे सचिन मागे लागलेले शनीच आहे.) नाहीतर 17 हजाराचा टप्पा त्याने मोहालीत पार केला असता.

विक्रमादित्य सचिन आजही तसाच नम्र आहे, जसा तो 20 वर्षांपूर्वी होतो. त्याच्या डोक्यात हवा गेली नाही. त्याचे पाय कायम जमिनीवर असतात. त्याच्या बोलण्यात वा वागण्यात उद्धटपणा आला नाही किंवा अहंभाव आला नाही. आपल्यावर केलेल्या टीकेला तो स्वत: कधीही उत्तर देत नाही. परंतु आपल्या बॅटनेच टीकाकारांना त्याच्याकडून उत्तरे मिळत असतात. मैदानावर असूनही त्याच्याबद्दल कोणताही प्रवाद उठला नाही. यामुळे क्रिकेटचा तो दैवत झाला आहे. त्याची लोकप्रियता भारतातच नाही तर जगभरात पसरली आहे. सर डॉन ब्रॅडमनपासून ब्रायन लारापर्यंत सर्वच खेळाडूंनी त्याचे श्रेष्ठत्व मान्य केले आहे.

सचिन बॅड पॅचमध्ये आला की त्याला निवृत्तीचे सल्ले देणार्‍या सल्लागारांचे पीक काँग्रेस गवतासारखे उगवते. परंतु चांगल्या खेळीने तो त्यांना उत्तर देतो. आपणास क्रिकेटचा आनंद लुटायचा असल्याचे सांगून तो सर्वांना टोलवून लावतो. भारतासाठी खेळत राहून धावांची भूक अशीच कायम ठेवण्याचे त्याचे स्वप्न आहे. देशाला विश्वकरंडक जिंकून देण्याची त्याची महत्वाकांक्षा आहे.


माझा विक्रम कुणा भारतीयानेच मोडावा- सचिन


विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. पण माझा विक्रम कुणा भारतीय फलंदाजाने मोडल्यास विशेष आनंद वाटेल, अशी नम्र प्रतिक्रिया एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावून विश्वविक्रम करणार्‍या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केली आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये गेल्या चार दशकांत कधीही द्विशतक झळकावले गेले नव्हते. सचिनने  ग्वाल्हेरच्या मैदानावर त्या कामगिरीलाही गवसणी घातली. पण आपला हा विक्रमही कधी ना कधी मोडला जाईल, याची नम्र जाणीवही त्याला आहे.

'कोणताच विक्रम अभेद्य नसतो. विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. पण हा विक्रम कुणा भारतीयाने मोडला हे पहायला मला आवडेल', असे सांगून सचिनने हे द्विशतक त्याच्या चाहत्यांना अर्पण केले.

सचिन नेहमी विक्रमासाठी खेळतो, अशी टीका त्याच्यावर केली जाते. त्याला उत्तर देताना तो म्हणाला, 'मी कधीही विक्रमांसाठी खेळत नाही. आनंदासाठी आणि माझ्या खेळाविषयक असलेल्या निष्ठेपायी खेळतो. मी खेळायला सुरवात केली, तेव्हा विक्रम मोडण्यासाठी म्हणूनही मी कधी मैदानात उतरलो नव्हतो, याची आठवणही त्याने करून दिली. 

विरुंगुळा



कृपया ही व्यंगचित्र फ़क़्त मनोरंजनाच्या दृष्टीने अपलोड केली आहेत याची नोंद घ्यावी. कुठलाई कॉपीराईट वापरण्याचा माझा हेतू नाही. 

शिवसेना भव्यपणे साजरा करणार महाराष्ट्र दिन

मुंबई -  संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाचा सोहळा शिवसेना भव्यदिव्य स्वरूपात, तसेच जल्लोषात साजरा करणार असल्याची घोषणा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज केली. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 25 एप्रिल रोजी शिवसेनेच्या वतीने "रक्तदान महायज्ञ' आयोजित करण्यात येणार असून, 1 मे रोजी "गर्जा जयजयकार' या अनोख्या संगीतमय कार्यक्रमाने महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राजकारण न आणता सर्व राजकीय पक्षांनी व महाराष्ट्रप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

उद्धव ठाकरे यांनी सांगितले, की 1 मे रोजी सायंकाळी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्‍सच्या मैदानात "गर्जा जयजयकार' हा कार्यक्रम होईल. त्याचे प्रमुख आकर्षण असतील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर. अनेक वर्षांनंतर लतादीदी रंगमंचावर गाताना पाहण्याचा व ऐकण्याचा सुवर्णयोग रसिकांना या कार्यक्रमातून अनुभवता येईल. लतादींदीसमवेत उषा मंगेशकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर हेही या कार्यक्रमात सहभागी होतील. फटाक्‍यांच्या आतषबाजीत व तुफान जल्लोषात हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश शिवाजी पार्कवर जेव्हा आणण्यात आला, तेव्हा त्या समारंभात लता मंगेशकर यांनी गायलेले "बहु असोत सुंदर संपन्न की महा' हे महाराष्ट्र गीत यंदा पुन्हा एकदा त्या सादर करणार आहेत.

याच सोहळ्याचा एक भाग म्हणून 30 एप्रिल रोजी हुतात्मा चौकात शिवसेनेच्या वतीने दीपमाला लावण्यात येणार आहेत. "मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' या मागणीसाठी रक्त सांडणाऱ्या मराठी माणसांच्या हौतात्म्याचा आदर राखण्यासाठी व अखंड महाराष्ट्राचे वैभव जतन करण्याच्या दृष्टीने 25 एप्रिल रोजी गोरेगाव पूर्व येथील एनएसई संकुलात "रक्तदान महायज्ञ' आयोजित करण्यात आला आहे.

उद्धव यांची "राज'कीय टोलेबाजी!शिवसेनेची धार अद्याप बोथट झाली नाही, पण ज्या पक्षांची धार बोथट झाली आहे, त्यांना धार कोण काढणार, असा उपरोधिक सवाल या वेळी उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, की बेळगाव-कारवार सीमा भागातील मराठी बांधवांसाठी शिवसेना लढत आहे, पण दुसऱ्या कोणाला त्यांच्यासाठी लढा द्यावा असे वाटत नाही. येथील मराठी माणसांसाठी लढणाऱ्यांच्या कानावर तेथील मराठी बांधवांचा आकांत येत नाही काय, असा खोचक प्रश्‍न राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी विचारला. शिवाजी पार्कवर शिवाजी महाराजांच्या जीवनप्रसंगांची दोन म्युरल्स उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पांना विरोध करणाऱ्या शिवद्वेष्ट्यांचा विरोध आम्ही मोडून काढू, असा इशाराही त्यांनी मनसेचे नाव न घेता दिला.

"सोनी'च्या "करोडपती'चे सूत्रसंचालन आमीरकडे?

मुंबई -  छोट्या पडद्यावर एक इतिहास रचणाऱ्या आणि उत्पन्नाच्या बाबतीत विक्रम प्रस्थापित करणाऱ्या "कौन बनेगा करोडपती' (केबीसी) या कार्यक्रमाचे पुनरागमन होत आहे. मात्र या वेळी हा कार्यक्रम "सोनी टीव्ही'वर दाखवला जाण्याची दाट शक्‍यता आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत "परफेक्‍शनिस्ट' म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आमीर खानने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करावे, यासाठी "सोनी' आणि त्याच्यामध्ये बोलणी सुरू आहेत. आमीरने अद्याप होकार किंवा नकार दिला नसल्याचे समजते.

परदेशात लोकप्रिय ठरलेल्या "हू वॉण्टस्‌ टू बी मिलेनियर' या कार्यक्रमावर बेतलेला "कौन बनेगा करोडपती' नावाचा कार्यक्रम "स्टार प्लस' वाहिनीने आणला होता. त्याचे सूत्रसंचालन विख्यात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केले होते. या कार्यक्रमामुळे केवळ वाहिनीलाच नाही तर खुद्द अमिताभ यांनाही चांगलाच फायदा झाला होता. त्यासाठी अमिताभ यांना काही कोटी रुपये मोजण्यात आले होते. त्या वेळी त्यांचे "लॉक कर दिया जाये...', "क्‍या नऊ बज गये क्‍या' यांसारखे संवादही लोकप्रिय ठरले होते. अमिताभ यांनी पहिल्या अन्‌ दुसऱ्या भागाचे सूत्रसंचालन केले होते. त्यानंतर तिसऱ्या भागासाठी अमिताभ यांनी नकार दिल्याने शाहरूख खानकडे ही जबाबदारी टाकण्यात आली होती. त्याने आपल्या पद्धतीने हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्याचा प्रयत्न केला होता; परंतु पहिल्या भागाची सर काही त्याला आली नाही. आता "केबीसी'चा चौथा भाग आणण्याचा घाट रचण्यात आलेला आहे. त्याबाबतची बोलणी सुरू आहेत. मात्र सूत्रसंचालन कोणी करावे, असा प्रश्‍न उपस्थित होताच अमिताभ आणि शाहरूख यांच्या नावाऐवजी आमीर खानचे नाव पुढे आले आहे. कारण अमिताभ यांनी हा कार्यक्रम आता करण्यास प्रकृतिअस्वास्थ्यामुळे नकार दिला आहे. शाहरूखने "केबीसी'च्या चौथ्या सत्रात काम करण्यास नकार दिल्याने "सिनर्जी ऍडलॅब्स' या प्रॉडक्‍शन हाऊसला "पाचवी पास' कार्यक्रम आणावा लागला होता आणि शाहरूखबरोबर आपला झालेला करार पूर्ण करावा लागला होता; परंतु आताचे चित्र निराळे आहे. आता केबीसी "स्टार'वर नाही, तर सोनी टीव्हीवर येण्याची शक्‍यता आहे.

मराठी माणसाला काय येत????

श्रावण

श्रावण -
श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ महिना मानतात. पावसाच्या सरींमुळे शेतीतील कामे पूर्ण झालेलीच असतात. हवा ओलसर गारव्याची, आल्हाददायक असते. सूर्यदर्शन नियमित होत नाही. पण सृष्टी हिरवा शालू नेसून नटलेली असते.

चातुर्मास्य (चतुर्मास) म्हणजे चार पवित्र मराठी महिने. चारही महिने अनेक धार्मिक दिवस पाळले जातात. व्रत-वैकल्ये केली जातात. शेतात कामे कमी प्रमाणात असतात. ईश्र्वराचे स्मरण व्हावे व आहारावर नियंत्रण ठेवले जावे म्हणून अनेक उपवास याच महिन्यात असतात.

पावसाळ्यात सूर्यदर्शन कमी वेळा होते. सृष्टी सौंदर्याने दिमाखात मिरवत असताना या काळात पचण्यासाठी जड पदार्थ खाल्यास ते तब्बेतीला हानीकारक आहेत असे आयुर्वेद आणि आहारशास्त्र सांगते. कांदा-लसूण असे मसालेदार पदार्थ, वांगं-टोमॅटो असे बिया असलेले भाजीचे प्रकार खाण्यात येऊ नयेत अशी एक प्रथा आहे. आहारनियंत्रण करून तब्बेत चांगली ठेवणे असा त्याचा उद्देश असावा असे अभ्यासक सांगतात. ज्या पदार्थामुळे वात होतो असे वातूळ पदार्थ खाल्ले जाऊ नयेत असाही त्याचा एक अर्थ. ईश्र्वरभक्ती, धार्मिक कृत्ये यातही व्यत्यय येऊ नये, पुढे येणार्‍या शेतीच्या मोठ्या कामांना तब्बेतीची तक्रार असू नये म्हणून तब्बेत जपण्याचा हा मार्ग असावा. या श्रावण महिन्यातील सण-उत्सवांची संख्या तुलनेने अधिक आहे.

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा - व्यासपूजा महोत्सव


आषाढी पौर्णिमा या तिथीला, पूर्णचंद्र आकाशात असताना, जगद्गुरू श्री व्यासमहर्षींचे स्मरण करून, आपल्या 
विकासासाठी, श्री परम्रेश्वराच्या कृपाआशीर्वादासाठी प्रार्थना करण्यासाठी, एकत्र जमण्याचा उत्सव.
आषाढातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून किंवा व्यासपूजन करून साजरी करतात. गुरुपरंपरेत व्यासांना सर्वश्रेष्ठ गुरू मानले आहे. भारतीयांना गुरु-शिष्य परंपरेचे फार महत्त्व आहे. आई-वडील आणि गुरू ही तीन दैवते मानावीत असे सांगितले जाते. व्यासमहर्षी यांची पूजा म्हणजे गुरुपौर्णिमा. शंकराचार्य यांची पूजा म्हणजे गुरुपूजन. संत ज्ञानेश्र्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, श्री गोंदवलेकर महाराज, श्री साईबाबा, श्री गजानन महाराज आदी संत-सत्पुरुषांना गुरुस्थानी मानून महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांची पूजा केली जाते. गुरूने दाखवलेल्या मार्गाने जाऊन झालेल्या प्रगतीबद्दल गुरुकडे येऊन सांगणे, आशीर्वाद घेणे, कृतज्ञता व्यक्त करणे,  गुरुपूजन - मुरुवंदन करणे म्हणजेच गुरुपौर्णिमा.



गुरु-शिष्य परंपरा आजही काही क्षेत्रात जपली जाते. संगीत आणि नृत्य या क्षेत्रांत ही परंपरा पिढ्या न पिढ्या जपली जाते आणि अजूनही गुरुवंदनाने तिचे महत्त्व नव्या शिष्यांवर बिंबवले जात आहे. आजच्या काळात शाळा-महाविद्यालयांमध्येही या दिवशी ‘गुरुपूजन’ करून शिक्षक प्राध्यापकांविषयीचा आदर व्यक्त केला जातो.

समर्थ रामदास - कल्याण स्वामी, श्रीकृष्ण - अर्जुन, श्री रामकृष्ण- विवेकानंद अशा पूर्वीच्या गुरुशिष्यांची उदाहरणे डोळ्यासमोर ठेवून गुरुपूजन केले जाते. आजच्या काळातील महाराष्ट्रातील रमाकांत आचरेकर - सचिन तेंडुलकर ही गुरुशिष्यांची जोडीही अनुकरणीय आहे. आपल्या राज्यातील कुस्ती या खेळातही गुरूला मोठे स्थान आहे

पाचगणी

पाचगणी -
पाच डोंगरांवर वसलेले म्हणून पाचगणी असे नाव असलेले हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात (महाबळेश्र्वरपासून केवळ २० कि. मी. अंतरावर) आहे. हे ठिकाण सुमारे १३७२ मीटर उंचीवर आहे. पाचगणी आणि महाबळेश्र्वर ही दोन्ही ठिकाणे अनेक प्रेक्षणीय दृश्यांसाठी प्रसिद्ध आहेत. डोंगरकडे, दाट झाडी, चिंचोळे मार्ग, पर्यटनाचे ठिकाण म्हणून मुद्दाम तयार केलेले उत्तर रस्ते हे पाचगणीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

स्ट्रॉबेरी, तुती, केशरी गाजरे, मध, या सोबतच जॅम - जेली, सरबते तयार करणार्‍या कंपनीच्या उत्तम बागा हेदेखील पाचगणीचे आकर्षण आहे. रोपवाटिकांमधून मिळणार्‍या विविध फुला-फळांच्या रोपांची रेलचेल, यामुळे पाचगणीच्या निसर्गरम्य वातावरणात भर पडली आहे.

अनेक निवासी शाळा पाचगणीमध्ये गेली बरीच वर्षे कार्यरत आहेत.

महाबळेश्र्वर - पाचगणी जवळच छत्रपती शिवाजी महाराज - अफजलखान यांची भेट झाली. या भेटीत महाराजांनी खानाला यमसदनास पाठवले. त्या ऐतिहासिक प्रसंगाची साक्ष देणारा प्रतापगड आजही दिमाखाने उभा आहे. सातारा जिल्ह्यातच येथून जवळच सज्जनगड हा समर्थ रामदास स्वामींचे समाधिस्थान असलेला गड आहे.

सातारा जिल्ह्यात पाचगणी येथील हॅरिसन फॉली येथे पॅराग्लायडिंगची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी दिवसभर होत असते