Saturday, April 3, 2010

लता मंगेशकर

लता मंगेशकर (जन्म: सप्टेंबर २८, १९२९) भारताच्या महान गायिका आहेत. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. संगीत-विश्वात त्यांना 'लता-दीदी' म्हणून ओळखले जाते. लता-दीदीच्या कारकीर्दीची सुरूवात १९४२ मध्ये सुरू झाली आणी सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, इतर वीस वर प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता-दीदींचा परिवार संगीतासाठी प्रसिद्ध असून, त्यांच्या भावंडांमध्ये सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणी ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर समाविष्ट आहेत. लता-दीदींचे वडील मास्टर दिनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

भारताचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' प्राप्त होणार्‍या गायक-गायिकांमध्ये लता-दीदींचे नाव दुसर्‍या क्रमांकावर आहे.

लता-दीदींचे नाव 'गिनेस बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये १९७४ ते १९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नमूद आहे.

बालपण
लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजंसी) च्या इंदोर शहरात शीख मोहल्ला येथे एका महाराष्ट्रीय कुटुंबात झाला. त्यांचे पाळण्यातले नांव हृदया. त्यांचे वडील पंडित दिनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलाकार होते.गणेश भट अभिषेकी हे कर्‍हाडे ब्राह्मण त्यांचे पिता. त्यांच्या मातोश्री, शुद्धमती ह्या मा. दिनानाथांच्या द्वितीय पत्नी होत्या. कुटुंबाचे आडनाव हर्डीकर होते; दिनानाथांनी आपले मूळ गाव मंगेशी - (गोवा) वरून आडनाव मंगेशकर असे बदलले. लता-दीदी आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणी हृदयनाथ ही त्यांची लहान भावंड.

लताला पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्याच वर्षी तिने वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरूवात केली. वडिलांच्या गायनाचा आणी धड्यांचा तिच्यावर ठसा उमटला.

चित्रपटसृष्टीत १९४० च्या दशकात सुरूवातीची कारकीर्द
१९४२ मध्ये लता-दीदी अवघ्या १३ वर्षांच्या होत्या, तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक - मास्टर विनायक ह्यांनी लता-दीदींच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लता-दीदींना गायिका आणी अभिनेत्री म्हणून कामाची सुरूवात करून दिली.

लता-दीदीने नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हसाल (१९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी लतादीदींना नवयुगच्या पहिली मंगळागौर (१९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भुमिका दिली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लतादीदीही मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ(भेंडीबाजारवाले) ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (१९४६) ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले (दत्ता डावजेकर हे त्या गाण्याचे संगीतकार होते). लता आणी आशा (बहिण) यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात (बडी माँ - १९४५) नूर जहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात लतादीदीने माता तेरे चरणोंमें हे भजन गायले. मास्टर विनायकांच्या दुसर्‍या हिंदी चित्रपटाच्या (सुभद्रा - १९४६) ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लतादीदीची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली.

१९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवालेंनी नवनिर्मीत पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी उस्ताद अमानत खाँ(देवासवाले) यांचेकडून शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडून ही दीदींना तालीम मिळाली.

१९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लताजींचे मार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूर जहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई(अंबालेवाली), ह्यांसारख्या अनुनासिक आणी जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या.

ग़ुलाम हैदरांनी लताजींची ओळख तेव्हा शहीद (१९४८) ह्या हिंदी चित्रपटावर काम करी असलेले निर्माते शशाधर मुखर्जींशी केली, पण मुखर्जींनी लताचा आवाज "अतिशय बारीक" म्हणून नाकारला. तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते - येणार्‍या काळात निर्माते आणी दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणी आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. हैदरांनी लतादीदींना मजबूर (१९४८) ह्या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली.

सुरूवतीला लता आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूर जहाँचे अनुकरण करीत असे, पण नंतर लतादीदीने स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लीम कवी असत, त्यामुळे गाण्यांच्या भावकाव्यात भरपूर हिंदुस्तानी शब्द असत. एकदा सुप्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार कडून लतादीदीला हिंदी/हिंदुस्तानी गाण्यातील "मराठी" उच्चारांसाठी हलकी अस्विकृती दाखवणारा शेरा मिळाला, तेव्हा लताने शफ़ी नावाच्या मौलवींकडून हिंदुस्तानी उच्चारांचे धडे घेतले.

लोकप्रिय चित्रपट महल (१९४९) चे आयेगा आनेवाला हे गाणे लताच्या कारकीर्दीला एक महत्वाचे वळण देणारे ठरले. (गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे अभिनेत्री मधुबाला ने म्हटले होते.)

 १९५० च्या दशकात उत्कर्ष
१९५० च्या दशकात लताने ज्या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायिली, अशा नामांकित संगीतकरांची नावे - अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, नौशाद, सचिन देव बर्मन, सी. रामचंद्र, हेमंत कुमार, सलिल चौधरी, खय्याम, रवी, सज्जाद हुसेन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, वसंत देसाई, सुधीर फडके, हंसराज बहल आणी उषा खन्ना. (सुप्रसिद्ध संगीतकार ओ.पी. नय्यर हे असे एकमेव अपवाद होते ज्यांनी आपल्या रचनांसाठी लताऐवजी आशा भोसलेना जास्त प्राधान्य दिले.)

संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखाली बैजु बावरा (१९५२), मुग़ल-ए-आज़म (१९६०) आणी कोहिनूर (१९६०) ह्या चित्रपटांसाठी लताने शास्त्रोक्त संगीतावर आधारित काही गाणी गायिली. लताने नौशादांसाठी गायिलेले पहिले गाणे हे जी.एम.दुर्राणींसोबतचे द्वन्द्वगीत छोरेकी जात बडी बेवफ़ा आहे. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी शंकर-जयकिशन यांनी तर आपल्या जवळजवळ सर्व चित्रपटांच्या(विशेषतः राज कपूर च्या ) गाण्यांच्या गायिका म्हणून लतादीदींचीच निवड केली. अशा चित्रपटांमध्ये आग, आह, (१९५३), श्री ४२० (१९५५) आणि चोरी चोरी (१९५६) यांचा समावेश आहे. १९५७ पर्यंत सचिन देव बर्मन आपल्या बहुतेक चित्रपटगीतांच्या प्रमुख गायिका म्हणून लतादीदीचीच निवड करीत, उदा. सज़ा (१९५१), हाउस नं. ४४, (१९५५) आणी देवदास (१९५५). पण १९५७ ते १९६२ च्या काळात बर्मनदादांनी लतादीदी ऐवजी गीता दत्त आणी आशा भोसले ह्या गायिकांबरोबर आपली सर्व गाणी बसवली.

१९५० च्या दशकात लताबरोबर अतिशय लोकप्रिय गाणी बनवणार्‍यांपैकी एक सलिल चौधरी होते. लतादीदीला "सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका" म्हणून सर्वप्रथम फ़िल्मफ़ेयर पारितोषिक सलिल चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या आजा रे परदेसी ह्या मधुमती (१९५८) मधील गीतासाठी मिळाले.

१९६०चे दशक
१९६०च्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या. ह्या काळात लताने जवळजवळ सर्व संगीतकारांबरोबर गाणी ध्वनीमुद्रित केली, ज्यांपैकी अनेक गाणी अजरामर झाली. १९६० मध्ये प्यार कीया तो डरना क्या हे मुग़ल-ए-आज़म (१९६०) चे नौशादने संगीतबद्ध केलेले आणी मधुबालावर चित्रीत गाणे तुफान लोकप्रिय झाले. हवाई-धरतीचे अजीब दास्ताँ है ये हे शंकर-जयकिशन दिग्दर्शित आणी दिल अपना प्रीत पराई (१९६०) मध्ये मीना कुमारी वर चित्रीत गाणेही अतिशय प्रसिद्ध झाले.

१९६१ मध्ये लतादीदीने बर्मनदादांचे सहाय्यक जयदेव यांसाठी अल्ला तेरो नाम हे भजन गाण्याचे पाऊल उचलुन बर्मनदादांसोबत पुन्हा वाटचाल सुरू केली.

१९६२ मध्ये लताने बीस साल बाद चित्रपटातील कहीं दीप जले कहीं दिल ह्या हेमंत कुमार-दिग्दर्शित गाण्यासाठी दुसरे फिल्म फेअर पुरस्कार पटकावले.

२७ जून १९६३ ला, भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लतादीदीने कवी प्रदीप लिखीत आणी सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ऐ मेरे वतन के लोगों हे देशभक्तिगीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. तेव्हा लताच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणार्‍या जवानांना श्रद्धांजलि वाहणारे गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रु उभे झाले.

१९६३ मध्ये सचिन देव बर्मन बरोबर पुन्हा गाणे सुरू केल्यानंतर लतादीदीने गाईड (१९६५) मधील आज फिर जीनेकी तमन्ना है, पिया तोसे नैना लागे रे, गाता रहे मेरा दिल (किशोर कुमार सोबत युगलगीत) तसेच ज्वेल थीफ़ (१९६७) मधील होटोंपे ऐसी बात यांसारखी बर्मनदादांची अनेक लोकप्रिय गाणी म्हटली.

१९६० च्या दशकात लतादीदीने मदनमोहन ह्या आपल्या आवडत्या संगीतकाराची अनेक गाणी म्हटली. अशा गाण्यांमध्ये अनपढ (१९६२) चे आपकी नज़रोंने समझा, वो कौन थी (१९६४) ची लग जा गले, नैना बरसे तसेच मेरा साया (१९६६) चे तू जहां जहां चलेगा ह्या सुरेल गाण्यांचा विशेष उल्लेख होतो.

१९६० च्याच दशकात लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्या नवोदित संगीतकार-जोडीची जवळ-जवळ सर्व गाणी लतानेच म्हटली. लता मंगेशकरच्या गाण्यांमुळेच ही जोडी हिंदी चित्रपटसंगीत क्षेत्रात अजरामर झाली. पारसमणी (१९६३) ह्या लक्ष्मी-प्यारे जोडीच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटातली लताची गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. लतादीदीने मराठी सिनेमांसाठी अनेकानेक गाणी गायिली. त्यांनी ज्या नामांकित संगीतकारांबरोबर काम केले, त्यांमध्ये ह्रुदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभु, श्रीनिवास खळे आणी सुधीर फडकेंचा विशेष उल्लेख होतो. लतादीदीने स्वतः 'आनंदघन' ह्या उपनावाखाली मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत. १९६० आणी १९७० च्या दशकांमध्ये लताने संगीतकार सलिल चौधरी आणी हेमंतकुमारांची बांगला भाषेतली गाणीही म्हटली आहेत.

लता मंगेशकरने (मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी आणी किशोर कुमार यांसारख्या त्या काळातील सर्व प्रसिद्ध गायकांबरोबर युगलगीते गायिली आहेत.

अभिजात संगीतात उस्ताद आमिरखा आणि उस्ताद बडे गुलामअली हे त्यांचे आवडते गायक आहेत.

No comments:

Post a Comment