दूरदर्शनने जाहिरातींच्या मागे न लागता जी सामाजिक बांधिलकी जपली आहे, त्याचा प्रत्यय याही उपक्रमात आला. संगीत, नाट्य-नृत्य, कला यांचा मेळ या निमित्ताने घातला गेला. सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता, संगीतकार आनंदजी, खय्याम, भप्पी लहिरी, अच्युत गोडबोले, गौतम राजाध्यक्ष आदींनी केले. या वेळी विजया मेहता म्हणाल्या, की या नऊ जणांनी हा पुरस्कार प्रसिद्धीसाठी मिळविलेला नाही. कलाकार हा आपल्यातील कला इतरांपुढे साकारण्यासाठी धडपडत असतो. आपण सर्वच जण आपापल्या परीने कामाला जुंपलेले असतो. ही मंडळी करतात ते "कार्य' असते काम नसते. त्यामुळे आपण कलाकारांचे देणे लागतो. त्यातून किंचित उतराई होण्याचा हा "सह्याद्री'चा उपक्रमही स्तुत्य आहे.
या वेळी ज्येष्ठ कलाकार सुहास जोशी यांना "नाट्यरत्न', संगणक प्रशिक्षण विवेक सावंत यांना "शिक्षणरत्न', साहित्यिक आसाराम लोमटे यांना "साहित्यरत्न', समाजसुधारक राम इंगोळे यांना "सेवारत्न', बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी "रत्नसौरभ', कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना "कलारत्न', सिनेदिग्दर्शक एन. चंद्रा यांना "चित्ररत्न', संशोधक डॉ. बाळ फोंडके यांना "रत्नदर्पण', शास्त्रीय गायिका आश्विनी भिडे-देशपांडे यांना "स्वररत्न' पुरस्काराने गौरविण्यात आले. सुभाष अवचट, पुष्पा भारती, डॉ. श्रीकांत चोरघडे, विजया मेहता, खय्याम, आनंदजी, परीक्षित साहनी, रमाकांत आचरेकर, गौतम राजाध्यक्ष, भप्पी लहिरी, विश्वनाथ सचदेव, डॉ. आर. सिन्हा यांच्या हस्ते या नवरत्नांचा सन्मान झाला.
कुमार केतकर, लता नार्वेकर, अच्युत गोडबोले व मिलिंग वागळे यांनी या विविध क्षेत्रातील नवरत्नांची निवड केली होती. अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर हिला गोदरेज कंपनीचे प्रदीप उघडे आणि जयश्री टी. यांच्या हस्ते "फेस ऑफ दि इअर' या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बावडेकर आणि समीरा गुजर हिने केले. सांस्कृतिक कार्यक्रमांची झालर असलेल्या या कार्यक्रमाचे प्रक्षेपण 1 मे रोजी दुपारी चार वाजता "सह्याद्री' वाहिनीवर होईल.