Monday, April 5, 2010

नागपंचमी : 
श्रावण महिन्यात शुक्ल पंचमीला येणारा हा सण निसर्गातील प्राण्यांविषयी लोकांना जाणीव करून देणारा आहे. शेतीची नांगरण करण्याचा काळ, आणि त्यामुळे वारुळ-नाग असा त्याचा विचार करून नागांचे रक्षण करण्याचा संदेश देणारा हा सण आहे. कापणे, तळणे, भाजणे, नांगरणे अशी कामे करू नयेत अशी एक प्रथा त्याला जोडली आहे. वारुळांची पूजा व नागांची पूजा करून त्यांना दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. मुली, स्त्रिया झाडाला झोका बांधून खेळतात; झिम्मा, फुगडी यांसारखे पारंपरिक खेळही खेळतात. महाराष्ट्रात नागपंचमीला असंख्य तरुण पतंग उडविण्याचाही आनंद लुटतात. पतंग उडवण्याच्या माध्यमातून पुरुष या सणाला जोडले गेले आहेत. सृष्टी हिरवीगार होऊन वातावरण आनंदाचे झालेले असते त्याच वेळी म्हणजे श्रावणात असे बरेच सण-दिवस साजरे केले जातात. हा श्रावणाच्या सुरुवातीला येणारा सण आहे. वारुळापर्यंत जाणे हे आनंदाचे व्हावे, एकत्र येण्याची मजा सगळ्यांना घेता यावी म्हणून फेर धरणे, गाणी म्हणणे, फुगड्या, झिम्मा, झोका असे खेळ खेळणे या गोष्टी नागपंचमीला जोडल्या गेल्या असाव्यात.

सांगली जिल्ह्यात बत्तीसशिराळा नावाच्या गावात अनेक गारुडी नाग पकडून आणतात. नागांनी फणा काढणे, पुंगीने मोहून जाणे असे खेळ दाखवले जातात. ही प्रथा गेली कित्येक वर्षे सुरू आहे.



कहाणी नागपंचमीची


shankar
ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी, एक नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होता. चातुर्मासात श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वांत धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल. असं म्हणू लागली.

शेषभगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी कली. त्या वेषधारी मामानं वारूळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायकामुलांना ता‍कीद दिली की, हिला कोणी चावू नका!

shiv
एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करी लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागीण रागावली. सर्व हकीकत नवर्‍याला सांगितली. तो म्हणाला, तिला लौकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत् आनंदानं वागू लागली. ऐके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून, तिला सासरी पावती केली.

shankar
नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपटं कशान तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चि‍त्रं काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागाणे, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात आहेत. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत, असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली, दूध, पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसर्‍या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

जय जय महाराष्ट्र माझा


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।

रेवा वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा।।

भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंव्ह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा।।

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दरिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ।।


* कवी - राजा बढे       * संगीतकार - श्रीनिवास खळे       
* मूळ गायक -शाहीर साबळे व समूह

खरा स्वधर्म हा आपुला


खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाची अनुष्ठीला, भला देखे

स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे !

माय भवानी प्रसन्न झाली
सोनपावली घरास आली
आजच दसरा, आज दिवाळी
चला, सयांनो, अंगणि घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाउल पडते पुढे !

बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होऊ अभिमन्यूचे
दूध आईचे तेज प्रवाही
नसांतुनी सळसळे
मराठी पाउल पडते पुढे !

स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे, सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई !
जय जय रघुवीर समर्थ

शुभघडीला शुभमुहूर्ती
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी, जय भवानी
दश दिशांना घुमत वाणी

जयजयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे !!


* कवयित्री - शांता शेळके   * संगीतकार - आनंदघन  
* मूळ गायक -लता, उषा, मीना, हृदयनाथ मंगेशकर, हेमंतकुमार

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा


बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तुरंगि जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा

नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा


* कवी - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर         * संगीतकार - शंकरराव व्यास
* मूळ गायक - ललिता फडके, व्ही. जी. भाटकर

मंगल देशा, पवित्रा देशा..


मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥

अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥


* कवी -गोविंदाग्रज * संगीतकार - वसंत देसाई  * मूळ गायक - जयवंत कुलकर्णी व समूह

प्राचीन महाराष्ट्र


प्राचीन महाराष्ट्र :
महाराष्ट्राचा इतिहास आणि ‘महाराष्ट्र’ नावाचा उल्लेख शोधण्यासाठी आपणास प्राचीन कालखंडात जावे लागते. नर्मदा नदीच्या उत्तरेस उत्तरापथ किंवा आर्यावर्त आणि दक्षिणेस ‘दक्षिणापथ’ असे म्हणत. चंद्रगुप्त मौर्यांच्या कालखंडातील आर्य चाणक्य उर्फ कौटिल्य यांनी लिहिलेल्या ‘अर्थशास्त्र’ ग्रंथात अश्मक व अपरान्त या देशांचा उल्लेख आहे. अश्मक म्हणजे अजिंठ्याच्या आसपासचा प्रदेश.

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरण गावी एक शिलालेख सापडला आहे. तो चौथ्या शतकातील आहे. या शिलालेखात सेनापती सत्यनाग याने स्वत:ला ‘माहाराष्ट्र’ असे म्हणवून घेतले आहे. पुढच्या कालखंडात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी आपल्या शिष्यांना ‘महाराष्ट्री असावे’ असे सांगतात. 

महाराष्ट्र या नावाबरोबरच महाराष्ट्रातील आद्य मानववस्तीचा शोध आपण घेतला, तर आपणास नव्या संशोधनपद्धतीनुसार मिळालेली माहिती आश्र्चर्यकारक असल्याचे दिसते. नासिक, जोर्वे, नेवासे, चांडोली, सोनगाव, इनामगाव, दायमाबाद, नांदूर, मध्यमेश्वर या ठिकाणच्या उत्खननांमधून व अत्याधुनिक अशा ‘कार्बन-१४’ पद्धतीनुसार पुरातत्त्ववेत्यांनी महाराष्ट्रातील आद्य-मानवाचा कालखंड इ.स. पूर्वी सुमारे ५ लक्ष ते ३० लक्ष वर्षे मानला आहे. उपरोक्त व नद्यांच्या काठी झालेल्या उत्खननांतून असा निष्कर्ष इतिहासतज्ज्ञांनी काढला आहे की, आदि-अश्मयुगीन मानव महाराष्ट्रात एक ते दीड लाख वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या परिसरात वावरत असावा. पुढे वसाहती वाढत गेल्या. महाराष्ट्रात बाहेरुन-विशेषत: उत्तरेतून राजांचे प्रतिनिधी म्हणून लष्करी वेशाचे लोक येऊ लागले. मूळचे नागरिक आणि बाहेरुन आलेले यांच्यात सुरुवातीला संघर्ष व नंतर समन्वय झाला.
वरील कालखंडानंतर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाकडे आपण वळलो, तर आपणास महाराष्ट्रातील ठळक जाणवणार्‍या सत्ता पुढीलप्रमाणे दिसतात. सातवाहन घराण्यातील श्री सातकर्णी, गौतमीपुत्र सातकर्णी, वाकटकांचा विंध्यशक्ती, द्वितीय प्रवरसेन, चालुक्यांच्या घराण्यातील श्रेष्ठ असा सत्याश्री पुलकेशी, विक्रमादित्य, राष्ट्रकुटांपैकी मानांक, दंतिदुर्ग, प्रथम कृष्ण, ध्रुवराज, गोमंतकातील कदंब घराण्यातील अनंतदेव, अपरादित्य, मध्ययुगीन अशा यादव घराण्यातील द्रुढव्रत, भिल्लम, रामदेवराय या राजांनी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचे योगदान दिले. या राजांच्या ऐतिहासिक योगदानाला तोड नाही.