Wednesday, April 28, 2010

महाबळेश्वर-वाई-पाचगणी








पवना धरण







ऋषिकेशला हवा मदतीचा हात

गडहिंग्लज - मुलांच्या शस्त्रक्रियेला पैसे आणायचे कोठून या चिंतेतून एका महिलेने आपल्या दोन मुलीसह हिरण्यकेशी नदीत उडी मारून काल सायंकाळी चार वाजता आत्महत्या केली. सौ. अलका रवींद्र सावंत (वय 37), मुलगी रोहिणी ( 16) व स्नेहल (14) अशी त्यांची नावे आहेत. हे सर्वजण मांगनूर तर्फ सावतवाडीचे (ता. गडहिंग्लज) आहेत. पोहता येत असल्याने या महिलेचा ऋषिकेश (वय 11) नावाचा मुलगा सुदैवाने बचावला.

ऋषिकेशला हवा मदतीचा हातऋषिकेश आणि रोहिणीसाठी त्यांच्या शिप्पूरच्या नातेवाइकांनी मोठी रक्कम खर्च केल्याचे सांगण्यात येते. तरीसुद्धा त्यांची त्या आजारातून सुटका झालेली नव्हती. यामुळे अलका सतत पैशाच्या चिंतेत होत्या. आता ऋषिकेशवरचे आई, बहिणींचे छत्रही हरपले. वडिलांचा संपर्क नाही. यामुळे त्याला आधाराची आणि हृदयशस्त्रक्रियेसाठी दानशूर व्यक्ती आणि संस्थांकडून आर्थिक मदतीची गरज आहे.

मदतीसाठी संपर्क  - webeditor@esakal.com 

याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली व ऋषिकेशने सांगितलेली माहिती अशी - अलका यांचे माहेर शिप्पूर तर्फ नेसरी (ता. गडहिंग्लज) आहे. सहा वर्षांपासून त्या माहेरीच असतात. काल सकाळी गडहिंग्लजला जाऊन येऊ, असे सांगून त्या रोहिणी, स्नेहल आणि ऋषिकेशसह एसटीने गडहिंग्लजला आल्या. बसस्थानकावर द्राक्षे आणि भजी बांधून घेऊन हे सर्वजण भडगावकडे चालत गेले. हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलाजवळच्या शेतीवडीतून सर्वजण नदीकाठावर गेले. तेथे बसून द्राक्षे आणि भजी खाल्ले. त्यानंतर 'तुमच्या ऑपरेशनसाठी पैसे नाहीत. इतके पैसे कोठून आणायचे, यामुळे आपण नदीत जीव देऊ,' असे त्यांनी मुलांना सांगितले आणि सर्वांना बरोबर घेऊन नदीपात्रात उडी घेतली. रोहिणी आणि स्नेहल यांनी आईला मिठी मारली होती. त्यामुळे तिघीही बुडाल्या. ऋषिकेशला पोहता येत असल्याने तो पोहत काठावर आला. तिघीनांही बुडत असल्याचे पाहून तो ओरडतच रस्त्यावर आला. तेथील नागरिकांनी ही घटना पोलिसांना कळविली. भडगाव व गडहिंग्लजच्या नागरिकांनी पुलावर गर्दी केली. पोलिस निरीक्षक आर. टी. जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. संजय येडूरकर, महादेव कोकणे, भीमा भोई, नागोजी भोई यांनी नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर येथील उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

अठरा वर्षांपूर्वी अलका व रवींद्र यांचे लग्न झाले. रवींद्रला दारूचे व्यसन आहे. यामुळे कुटुंबात सतत भांडण होत असे. याला कंटाळून अलका आपल्या मुलांसह माहेरी आल्या होत्या. रवींद्र इचलकरंजीत यंत्रमागावर काम करतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून त्याचाही संपर्क नसल्याचे शिप्पूरच्या नातेवाइकांकडून सांगितले जाते. इचलकरंजीत असताना मोठी मुलगी रोहिणीचे कान हातमागामध्ये सापडून तुटले होते. त्यावेळी डॉक्‍टरांनी ते कान नंतर शस्त्रक्रियेने जोडता यावे म्हणून तात्पुरते तिच्याच पोटाला बसविले होते. दरम्यानच्या काळात रोहिणीला अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतर काही वर्षांनी ऋषिकेशलाही हृदयविकार असल्याचे तपासणीत आढळून आले. त्याची हृदयशस्त्रक्रियाही झाली होती. परंतु सहा महिन्यांनंतर त्याच्या हृदयात पुन्हा दोष असल्याचे आढळले. डॉक्‍टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. अलका कोवाडच्या आश्रमशाळेतील मुलांना जेवण करून देण्याचे काम करत होत्या. याच शाळेत ऋषिकेश पाचवीत व स्नेहल सातवीत होते. हे तिघेही कोवाडमध्ये, तर रोहिणी शिप्पूरमधील आजी यशोदा जाधव यांच्याजवळ राहात होती. तिचे नववीपर्यंत शिक्षण झाले आहे. अलका यांचा एक भाऊ सैन्य दलात, तर एक मुंबईत नोकरीनिमित्त राहतो. चार दिवसांपूर्वी सुटी पडल्याने अलका, स्नेहल व ऋषिकेश तिघेही कोवाडहून शिप्पूरला आले होते. रोहिणी व ऋषिकेशच्या आजारावर उपचारासाठी इतकी मोठी रक्कम आणायची कोठून या चिंतेनेच अलकाने मुलासह आत्महत्येचा निर्णय घेतला.

* आई, जीव द्यायला नकोशस्त्रक्रियेला पैसे नसल्याने आपण सर्व जण जीव देऊ या, असे अलकानी मुलांना सांगितल्यानंतर ऋषिकेश "आई, जीव द्यायला नको,' असे सांगत होता. परंतु पैशाच्या चिंतेने आणि गरिबीला कंटाळलेल्या अलकाने त्याचे न ऐकता त्यालाही सोबत घेऊनच नदीपात्रात उडी घेतली. पोहता येत असल्याने ऋषिकेश बाहेर आला. घट्ट मिठी असल्याने तिघीही बुडाल्या.

* मृतदेहासाठी हवालदार पाण्याततिघींचा मृतदेह शोधासाठी पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण केले. परंतु एका मुलीचा मृतदेह लवकर सापडत नव्हता. यामुळे शेजारीच असलेले हवालदार गणेश मिरखा यांनी कशाचाही विचार न करता तातडीने पाण्यात उतरून शोधकाम सुरू केले. त्यांनी त्या मुलीचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेतून पोलिसांमधील माणुसकी अजूनही जिवंत आहे हेच श्री. मिरखा यांनी दाखवून दिले.

मदतीसाठी आमचा पत्ता - webeditor@esakal.com



'आयपीएल'वर करआकारणी अशक्‍य - मुख्यमंत्री

मुंबई - आयपीएल सामने संपले असल्याने त्यावर करआकारणी करणे अशक्‍य आहे. आता पुढील वर्षी त्याबाबत विचार करता येईल, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सांगितले. आयपीएलवर करआकारणीचा मुद्दा गेले दोन-अडीच महिने चर्चेत असताना अजूनही करआकारणी होऊ शकते, असे मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितले होते. मात्र, आता ते अशक्‍य असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.

केवळ आयपीएलवर मनोरंजन कर लावण्याचाच प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळापुढे नव्हता; तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व क्रिकेट सामन्यांवर कर लावण्याचा तो प्रस्ताव आहे. मंत्रिमंडळाचा याबाबत अंतिम निर्णय न झाल्याने त्याचा लाभ आयपीएलला मिळाला असला, तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवर मनोरंजन कर लागू होणार का? हा प्रश्‍न सध्या तरी अनिर्णीत अवस्थेतच पडून आहे.

आयपीएलसह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व क्रिकेट सामन्यांवर मनोरंजन कर लागू करण्याचा प्रस्ताव 20 जानेवारीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे ठेवण्यात आला. तो मंजूर झाला तरी त्याचे इतिवृत्त पुढील बैठकीत मंजूर न झाल्याने या निर्णयाला अंतिम स्वरूप मिळाले नाही. कसोटी सामने वगळता वन डे, ट्‌वेंटी-ट्‌वेंटीसह आयपीएल सामन्यांवर कर लावण्याचा महसूल विभागाचा प्रस्ताव होता. मुंबई महापालिका क्षेत्रातील सामन्यास 25 टक्के, राज्यातील अन्य महापालिका क्षेत्रात 20 टक्के आणि अन्य विभागात 15 टक्के अशा प्रकारे करआकारणीचा प्रस्ताव आहे.

आयपीएलवर राज्य सरकार कधी कर लावणार, अशी विचारणा सातत्याने विविध स्तरावरून होत होती. करआकारणीच्या प्रस्तावाचे इतिवृत्त मंजूर न करता तो थांबवून ठेवण्याचा प्रकार क्वचितच होतो. सरकारने निर्णय घेण्यास विलंब लावल्याने आयपीएल सामन्यांवर मनोरंजन कर लागू शकला नाही व त्याचा लाभ प्रेक्षकांना मिळाला. कर हा पूर्वलक्षी प्रभावाने आकारता येऊ शकत नाही. मनोरंजन कर हा प्रत्येक तिकिटामागे प्रेक्षकांकडून वसूल केला जातो. त्यामुळे आयपीएलचे सामने संपल्याने आता त्यावर करआकारणी करता येणार नाही, पुढील वर्षीसाठी विचार होऊ शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. पण आयपीएल पार पडले तरी मंत्रिमंडळापुढील प्रस्ताव तसाच अनिर्णीत अवस्थेत राहणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

प्रभा राव अल्पचरित्र

कॉंग्रेसमधील धाडसी व वादळी व्यक्तिमत्त्व - संसदीय राजकारणात महिलांना संधी मिळाली पाहिजे, म्हणून आता महिला आरक्षणाची चर्चा होत आहे; परंतु तीस-चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या काही थोड्या-थोडक्‍या महिला पुढे आल्या, त्यात प्रभा राव यांचे नाव नेहमीच आघाडीवर राहिले. कॉंग्रेसमध्ये त्यांच्या नेतृत्वगुणाला सातत्याने वाव मिळत राहिला. इंदिरा गांधींपासून राजीव गांधी व आता सोनिया गांधी यांच्यापर्यंत प्रभा राव यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. पक्षाने त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या टाकल्या त्या त्यांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडल्या. आपल्या स्वतःच्या खास शैलीने काम करताना त्यांनी पक्षाच्या भूमिकेला किंवा विचारसरणीला धक्का बसेल असे वर्तन त्यांनी सहसा कधी केले नाही. त्यांच्या करड्या शिस्तीमुळे पक्षात अनेक जण दुखावले गेले; परंतु त्याची त्यांनी फारशी कधी फिकीर केली नाही.

वर्धा जिल्ह्यातील रोहनी या गावात स्वातंत्र्यसैनिकांच्या वसु कुटुंबात प्रभा राव यांचा जन्म झाला. त्यांच्या वसु कुटुंबावर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता. राज्यशास्त्रात त्या एम. ए. झाल्या होत्या. शास्त्रीय संगीतातील पदवी त्यांनी प्राप्त केली होती. विधानसभेत त्यांनी पुलगाव मतदारसंघाचे व लोकसभेत वर्धा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 1972 ते 1976, 1976 ते 1977-78 आणि 1988 ते 1990 या कालावधीत चार वेळा त्या मंत्री होत्या. महसूल, शिक्षण, नियोजन, उद्योग, सांस्कृतिक, पर्यटन, क्रीडा व युवक कल्याण अशी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. 1978-79 मध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाचीही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. मंत्री म्हणून काम करताना त्यांनी आपली निर्णयक्षमताही सिद्ध करून दाखविली. त्यामुळे पुढे त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून नाव घेतले जायचे. त्यांचीही तशी महत्त्वाकांक्षा होती; परंतु तशी संधी त्यांना मिळू शकली नाही.

सरकारमधील मंत्री म्हणून प्रभा राव यांनी ज्या तडफेने काम केले, त्याच तडफेने त्यांनी पक्षातही विविध पदे भूषविली. 1984 मध्ये महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची पहिल्यांदा निवड झाली. त्यांच्या निवडीनेच मोठे वादळ निर्माण झाले. आपल्याला विश्‍वासात न घेता प्रदेशाध्यक्षाची निवड केल्याचा निषेध म्हणून वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. दिल्लीच्या अनेक बड्या नेत्यांनी मुंबईत येऊन दादांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला नाही. श्रीमती राव यांनी त्या वेळी पाच वर्षे अध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला. अखिल भारतीय कॉंग्रेसच्या सरचिटणीस म्हणून त्यांनी बरीच वर्षे कार्य केले. त्या काळात त्यांच्यावर दिल्ली, गोवा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, पश्‍चिम बंगाल, हरियाना, केरळ, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड अशा अनेक राज्यांची जबाबदारी देण्यात आली होती.

कॉंग्रेसला बरे दिवस आल्यानंतर 2004 मध्ये प्रभा राव यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात पाठविण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व प्रभा राव यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका लढल्या गेल्या. त्यानंतर मुख्यमंत्रिपदी विलासराव देशमुख आले. देशमुख व राव यांचे कधी फारसे पटले नाही. त्यावेळच्या राज्याच्या प्रभारी मार्गारेट अल्वा यांच्याशी त्यांचा चांगला सूर जमला होता. त्यांच्याच काळात नारायण राणे व त्यांचे आठ-दहा समर्थक आमदार कॉंग्रेसमध्ये आले. प्रभा राव यांचा अध्यक्ष म्हणून पक्षात मोठा दरारा होता. त्यांना पदाधिकाऱ्यांनी अघळपघळ वागलेले खपत नव्हते. त्यांच्या करड्या शिस्तीमुळे अनेक ज्येष्ठ पदाधिकारीही पूर्वपरवानगी न घेता त्यांच्यासमोर जायला कचरत असत. पक्षाच्या व्यासपीठावर कुणी मंत्री असला, तरी त्यांच्या परवानगीशिवाय कुणाचे बोलण्याचे धाडस होत नसे. एखादा निर्णय घेताना त्या कधी डगमगणार नाहीत, स्पष्टवक्तेपणा आणि परिणामांची पर्वा न करता निर्णय घेणे, अशी त्यांची कार्यशैली होती. पक्षश्रेष्ठींना नेमके काय हवे याचा अचूक अंदाज घेत, त्या अनेक धाडसी निर्णय घेत असत. त्यामुळे पक्षात कुणी दुखावले वा नाराज झाले, तर त्याची त्या पर्वा करीत नसत. आपल्याच सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढणारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सेझ प्रकल्पांचे परिणाम, कुपोषण, विजेची समस्या अशा प्रश्‍नांवर अहवाल तयार करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. 2008 मध्ये त्यांची हिमाचलच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. त्या वेळी पक्षाच्या वतीने इस्लाम जिमखान्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेले मुख्यमंत्री विलासराव देशमुख व महसूलमंत्री नारायण राणे यांना जवळ बोलाविले, एकमेकांच्या हातात हात दिले आणि यापुढे एकोप्याने काम करा, असा सल्ला दिला. त्या वेळी उपस्थित कॉंग्रेसजन भारावून गेले होते.