Thursday, April 8, 2010

नाशिक

नाशिक देवळांचे शहर 

स्वातंत्र्यवीर सावरकर, दादासाहेब फाळके, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर या महान व्यक्तिमत्वांची भूमी म्हणजे नाशिक. हे शहर देवळांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. पौराणिक काळापासून नाशिकला धार्मिक स्थळ म्हणून महात्म्य प्राप्त झाले आहे. 

देशात चार ठिकाणी कुंभमेळा भरतो, त्यापैकी दक्षिण भारतात नाशिक व त्र्यंबकेश्वर ही ठिकाणे आहेत.दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट पाहण्यासारखे आहेत. 

येथील प्रसिध्द ठिकाणे- ‍

1. त्र्यंबकेश्वर 



हे बारा जोतिर्लिंगांपैकी एक आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात ते वसले आहे. मुख्य ज्योतिर्लिंगाचे मंदिर पहाण्यासारखे आहे. त्याच्या चारही बाजूंनी कोट आहे. पूर्वेला मुख्या दरवाजा आहे. ब्रम्हा, विष्णू व महेशाची तीन लिंगे हे येथील वैशिष्ट्य आहे. 

मंदिराजवळच कुशावर्त तीर्थ हे कुंड आहे. मंदिरालालागूनच अहिल्या नदी वाहते. ब्रम्हगिरी पर्वतावरच गंगाद्वार हे ठिकाण आहे. येथे गोदावरी उगम पावते. त्याच्यावर ब्रम्हगिरीला जाण्याचा रस्ता आहे. तेथे भगवान शंकरांनी जटा आपटल्याच्या खूणा असल्याचे सांगितले जाते. 

कुशावर्त तीर्थ  कुंड


त्र्यंबकेश्वर वारकरी भक्तांसाठीही महत्त्वाचे टिकाण आहे. कारण ज्ञानेश्वरांचे गुरू निवृत्तीनाथांना येथेच गहिनीनातांचा अनुग्रह झाला होता. त्यांची समाधीही येथेच आहे. तेथे मोठा उत्सवही साजरा होतो. शिवाय कुंभमेळ्यात सहभागी होणार्‍या तेरा पैकी दहा आखाड्यांचे आश्रम येथे आहेत. 






त्र्यंबकेश्वरात बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारी तर लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील सोमवारी ब्रम्हगिरी पर्वताला फेरी मारण्याची परंपरा आहे. विशेषतः तिसर्‍या सोमवारी त्यासाठी मोठी गर्दी असते. हे स्थळ नाशिकपासून २७ किलोमीटरवर आहे.

2. पंचवटी- 







त्र्यंबकेश्वरहून उगम पावलेली गोदावरी नदी नाशिकमधून वाहते. या नदीमुळे नाशिकचे दोन भाग पडले आहेत. नदीच्या पलिकडील भागाला पंचवटी म्हणतात. पंचवटी भागातच रामाचे वास्तव् होते असे मानले जाते. येथे असलेल्या पाच वडांच्या झाडांवरून या भागाचे नाव पंचवटी पडले. 


प्रसिद्ध काळाराम मंदिर पंचवटीतच आहे. याशिवाय इतर अनेक मंदिरे येथे आहेत. पंचवटीतच सीता गुंफा आहे. या गुहेत सीता काही काळ राहिली होती, असे म्हणतात. गुहेत जायला फार छोटा रस्ता आहे. आतमध्ये राम लक्ष्मण व सीतेची मूर्ती आहे. येथूनच रावणाने सीतेचे अपहरण केल्याचे मानले जाते.

३. रामकुंड- 

रामकुंड

पंचवटीतील हे सर्वात महत्वाचे ठिकाण. पंचवटीतील वास्तव्यात श्रीराम स्नानासाठी येथे येत असल्याचे सांगितले जाते. याच ठिकाणी पिता दशरथाच्या अस्थींचे विसर्जन रामाने केले. येथे अस्थिविलय कुंड आहे. तेथे विसर्जित केलेल्या अस्थी वाहून न जाता वितळतात, अशी श्रद्धा आहे. जवळच गांधी तलाव आहे. या तलाव तसेच स्मारक आहे. महात्मा गांधीच्या अस्थी येथे विसर्जित केल्या हो्त्या. सिंहस्थ कुंभमेळ्यात शाहीस्नान याच कुंडात होत असते.

४. काळाराम व इतर मंदिरे 

पेशव्यांच्य काळात त्यांचे सरदार रंगवराव ओढेकर यांनी हे मंदिर बांधले. हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडापासून बनले आहे. त्याच्याभोवती दगडी कोट असून तो १७ फूट उंच आहे. मंदिरात आत ओवर्‍या आहेत. मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे. मंदिरात राम सीता व लक्ष्मण यांच्या २-२ फूट उंचीच्या मूर्ती आहेत. 

हे मंदिर बांधण्यास १७७८ साली सुरवात करण्यात आली होती. त्यासाठी जवळच्या रामशेज डोंगरावरून काळा दगड आणण्यात आला. हे मंदिर बांधायला तेवीस लाख रूपये खर्च आला होता. दोन हजार कामगार बारा वर्षे काम करत होते. दलितांना या मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. 

तो बरीच वर्षे चालला होता. काळारामाव्यतिरिक्त अनेक ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व लाभलेली मंदिरे या परिसरात आहेत. आकर्षक कलाकुसरीसाठी नारोशंकर मंदिर प्रसिद्ध आहे. पेशव्यांनी वसईच्या युद्धात विजय मिळाल्यानंतर काढून आणलेली घंटा याच मंदिरात बसवली आहे. याशिवाय नंदी नसलेली कपालेश्वर मंदिर आहे. प्राचीन सुंदरनारायण मंदिर आहे. 

५. तपोवन

पंचवटीतच गोदावरी व नंदिनी या नद्यांच्या संगमावर तपोवन हे ठिकाण आहे. तपोवन म्हणजे तप करण्याची जागा. पूर्वीच्या काळी या भागात दोन नद्यांच्या संगमामुळे हिरवळ होती. अतिशय प्रसन्न व मनोहारी वातावरणात साधू तपश्चर्येसाठी येथे येत असत. 

रामायणकाळात लक्ष्मण येथे येत असे. त्याने शूर्पणखेचे नाक कापण्याचा प्रसंग येथे घडला असे मानले जाते. या भागात काही गुहासुद्धा आहेत. नैसर्गिक सौंदर्यामुळे आजही पर्यटकांची येथे गर्दी असते. येथे हनुमान व लक्ष्मण यांची मंदिरेही आहेत. 

6. अंजनेरी 

हनुमानाचे जन्मस्थान मानले जाणारे अंजनेरी नाशिकपासून २० किलोमीटरवर आहे. या पर्वतावर जैनांची लेणीसुद्धा आहेत. गिर्यारोहणासाठी येथे असलेले सुळके प्रसिद्ध आहेत. गिर्यारोहक मोठ्या प्रमाणावर येथे येत असतात. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरच हे ठिकाण आहे. मंदिर डोंगरावर आहे. 

7. वणी- 

देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी वणी येथील जगदंबा देवी आहे. सप्तश्रंृग डोंगरावर हे स्थान आहे. डोंगरावर गेल्यानंतर तेथून नऊशे पायर्‍या चढून गेल्यानंर देवळात जाता येते. डोंगरातच देवीची मूर्ती कोरलेली आहे. अठराभूजा असलेली मूर्ती देखणी आहे. नवरात्र व चैत्रात येथे मोठी यात्रा भरते. 

ही देवी अनेकांची कुलदेवता आहे. त्यामुळे या काळात मोठी गर्दी असते. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर येथे भक्त येतात. अनेक भक्त आपल्या गावापासून कावडी भरून आणतात. हे ठिकाण नाशिकपासून ५२.२७ किलोमीटरवर आहे. 

8.बौद्धलेणी 

नाशिक मुंबई रस्त्यावर नाशिकपासून आठ किलोमीटरवर बौद्धलेणी आहेत. (ज्याला स्थानिक भाषेत पांडवलेणी म्हणतात.) पहिल्या वा दुसर्‍या शतकात ती बांधली असल्याचे मानले जाते. या लेण्यांच्या पायथ्याशी बुद्धविहार बांधण्यात आले आहे. 

9.फाळके स्मारक- 

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके नाशिकचेच. नाशिकमध्येच त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे देखणे स्मारक पांडवलेण्याच्या पायथ्याशी उभारण्यात आले आहे. 

१०. जिल्ह्यातील स्थळे 

नाशिकपासून तीस किलोमीटरवर असलेल्या सिन्नर येथील प्राचीन गोंदेश्वर मंदिर आवर्जून पाहण्यासारखे आहे. येवला हे शहर पैठणीसाठी प्रसिद्ध आहे. शिवाय १८५७च्या युद्धात पराक्रम गाजविणारे तात्या टोपे येवल्याचेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी त्याच धर्मात मरणार नाही ही घोषणा येवला येथेच केली. 

मालेगावजवळील झोडगे येथील गावी असलेले शिवमंदिर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधणीसाठी प्रसिद्ध आहे. इगतपुरीजवळील टाकेद हे ठिकाण पौराणिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. सीतेला पळवून नेणार्‍या रावणाशी युद्ध करून याच ठिकाणी जटायू पक्षी निपचित पडला होता. त्याच्या स्मृत्यर्थ येथे जटायू मंदिरही आहे. 

इगतपुरी येथे सत्यनारायण गोयंका यांनी उभारलेले विपश्यना केंद्र आहे. तेथे जगभरातून लोक येतात. चांदवड येथील रेणुका देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत अनेक गिर्यारोहणासाठी योग्य अशी ठिकाणे आहेत. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर नाशिकहून घोटीमार्गे जाण्यास जवळ आहे. शिवाय राज्यातील सर्वांत उच्च किल्ला म्हणून गणला जाणारा साल्हेरचा किल्लाही जिल्ह्यातच आहे.

जाण्याचा मार्ग ः 
 
नाशिकला राज्यातील सर्व शहरातून येण्यास बस आहेत. शिवाय नाशिक रेल्वेमार्गावरही आहे. पुण्यापासून नाशिक २१० तर मुंबईपासून २३० किलोमीटर आहे.पंचवटी हे नाशिक शहरातील एक ऐतिहासिक महत्त्व असलेले एक धार्मिक स्थान असून हे स्‍थळ गादावरी या नदीच्‍या काठावर आहे. पौराणिक संदर्भांनुसार वनवासाच्या काळात रामाने येथे वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा, रामकुंड, पेशवे यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे कोरीव दगडात कलाकुसर असलेले स्‍थळ पाहण्‍यासारखे आहे.

महाराष्ट्रातील अभयारण्ये

अभयारण्य    जिल्हा

कर्नाळा (पक्षी)    रायगड

माळठोक (पक्षी)    अहमदनगर

मेळघाट (वाघ)    अमरावती

भीमाशंकर (शेकरू खार)    पुणे

सागरेश्वर (हरिण)    सांगली

चपराळा    गडचिरोली

नांदूरमधमेश्वर (पक्षी)    नाशिक

देऊळगाव रेहकुरी (काळवीट)    अहमदनगर

राधानगरी (गवे)    कोल्हापूर

टिपेश्वर (मोर)    यवतमाळ

काटेपूर्णा    अकोला

अनेर    धुळे

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने

राष्ट्रीय उद्याने    ठिकाण

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान    बोरिवली व ठाणे

पेंच राष्ट्रीय उद्यान    नागपूर

नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान    गोंदिया

ताडोबा राष्ट्रीय उद्यान    चंद्रपूर

गुगामल राष्ट्रीय उद्यान (मेळघाट)    अमरावती

चांदोली राष्ट्रीय उद्यान    सांगली, सातारा,

कोल्हापूर, रत्नागिरी

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे

थंड हवेची ठिकाणे    जिल्हा

चिखलदरा    अमरावती

म्हैसमाळ    औरंगाबाद

पन्हाळा    कोल्हापूर

रामटेक    नागपूर

माथेरान    रायगड

महाबळेश्वर, पाचगणी    सातारा

तोरणमळ    धुळे

लोणावळा, खंडाळा    पुणे

महाराष्ट्रातील प्रमुख घाट व रस्ते

प्रमुख घाट    रस्ते/महामार्ग
कसारा / थळ घाट    मुंबई ते नाशिक

माळशेज घाट    ठाणे ते अहमदनगर

दिवे घाट    पुणे ते बारामती

कुंभार्ली घाट    कराड ते चिपळूण

फोंडा घाट    कोल्हापूर ते पणजी

बोर / खंडाळा घाट    मुंबई ते पुणे

खंबाटकी घाट    पुणे ते सातारा

पसरणी घाट    वाई ते महाबळेश्वर

आंबा घाट    कोल्हापूर ते रत्नागिरी

चंदनपुरी घाट    नाशिक ते पुणे

महाराष्ट्रातील नद्यांची संगम स्थाने

कृष्णा-कोयना    - कराड (प्रीतिसंगम), जि. सातारा
कृष्णा-पंचगंगा    - नरसोबाची वाडी (कोल्हापूर)
मुळा-मुठा    - पुणे
वैनगंगा-वर्धा    - चंद्रपूर
वर्धा-वैनगंगा    - शिवनी
कृष्णा-वारणा    - हरिपूर (सांगली)
तापी-पूर्णा    - चांगदेव (जळगाव)

महाराष्ट्रातील नदीकाठावरील शहरे व तीर्थक्षेत्रे

पंढरपूर    भीमा
नेवासे, संगमनेर    प्रवरा
नांदेड, नाशिक, पैठण, गंगाखेड    गोदावरी
मुळा-मुठा    पुणे
भुसावळ    तापी
हिंगोली    कयाधू
धुळे    पांझरा
देहू, आळंदी    इंद्रायणी
पंचगंगा    कोल्हापूर
वाई, मिरज, कऱ्हाड    कृष्णा
जेजुरी, सासवड    कऱ्हा
चिपळूण    वशिष्ठी
श्री क्षेत्र ऋणमोचन    पूर्णा

महाराष्ट्रातील अष्टविनायक

श्री मोरेश्वर    मोरगाव    पुणे
श्री गिरिजात्मक    लेण्याद्री    पुणे
श्री महागणपती    रांजणगाव    पुणे
श्री विघ्नहर    ओझर    पुणे
श्री चिंतामणी    थेऊर    पुणे
श्री वरदविनायक    महड    रायगड
श्री सिद्धिविनायक    सिद्धटेक    अहमदनगर

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे
त्र्यंबकेश्वर- जिल्हा नाशिक
घृष्णेश्वर- वेरुळ जिल्हा औरंगाबाद
भीमाशंकर- जिल्हा पुणे
परळी वैजनाथ- जिल्हा बीड
औंढा नागनाथ- जिल्हा हिंगोली.

प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश

बहू असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा..’ या शब्दात कोल्हटकरांनी आपल्या महाराष्ट्राची थोरवी गायिली आहे. अजिंठा, वेरुळ, कार्लेभाजे, कान्हेरी, एलिफंटा, पांडव लेण्यांनी नटलेला; संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गोरोबा, संत जनाबाई, संत गाडगेबाबा, कान्होपात्रांनी मंतरलेला; छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीने तेजाळलेला, संभाजीच्या हौतात्म्याने अजरामर झालेला; माँ जिजाऊच्या आशीर्वादाने बहरलेला; फुले, आंबेडकर, शाहू, आगरकर, सावरकर, टिळक, फडके यांच्या त्याग आणि क्रांतिकार्याने पुनीत झालेला हा महाराष्ट्र. तर मग अशा ह्या आपल्या महाराष्ट्राविषयी थोडा काही जाणून घेऊया

पोळा

श्रावण अमावास्येला बैलांची पूजा करून, त्यांना उत्तम जेवायला देऊन, कामातून विश्रांती दिली जाते. सजवून त्यांची मिरवणूक काढण्याचा हा दिवस.

शेतकर्‍यांच्या मदतीसाठी तत्पर असलेल्या बैलांना (पशुधनाला) त्यांच्या श्रमातून बदल देणे, त्यांना रजा देणे, त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवणे असा त्यामागे अर्थ आहे. शेतातील कामे संपत आल्याने शेतकरी या उत्सवात बैलांसह आनंदाने सहभागी होऊ शकतात.


प्रत्येक शिव मंदिरात असणारा नंदी, वृषभ म्हणजेच बैल. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत बैलांना  सजवून त्यांची मिरवणूक काढतात. ज्या ठिकाणी दुग्धव्यवसाय, एकूणच शेती मोठ्या प्रमाणात उत्पन्न देते अशा ठिकाणी भरपूर पशुधन असते. सुबत्ता असल्यास ते पशुधन सुदृढही असते. तिथे बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा करतात. पश्चिम महाराष्ट्र त्यात पुढे आहे. कोकणात या उत्सवाला ‘बेंदूर’ असे नाव आहे. बंगालमध्ये, गुजराथमध्येही बैलांचा सण साजरा होतो. दररोज ज्याच्याकडून मेहनत करून घेतो, त्याच्या श्रमाची पावती देणे, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून, ओवाळून खायला देणे अशा गोष्टी केल्या जातात.




बैलाचे कष्ट शेताच्या प्रत्येक कामासाठी शेतकरी घेतो, त्यामुळेच त्याला भरपूर धान्य मिळते. अशा मूक प्राण्याला शेतीची कामे संपल्यावर विश्रांती देणारा हा सण! कृषिप्रधान संस्कृती याच्या मुळाशी आहे. निसर्गरूपांना देव मानणे, नवे धान्य आल्यावर त्याची पूजा करणे, हत्यारे-अवजारे यांची पूजा करणे, जमिनीला मातेसमान मानणे या पद्धती कृषिसंस्कृतीशी जोडलेल्या आहेत.





या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठुन दिसावा या साठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.गावाच्या सिमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करुन बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पध्दत आहे.त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमिनदार) याचेतर्फे तोरण तोडले जाते व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेउन ओवाळण्यात येते.बैल नेणार्‍यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात.
असा हा पोळ्याचा सण आहे. दिवसेंदिवस होणार्‍या नापिकीमुळे व खालावणार्‍या आर्थिक परिस्थितीमुळे याचा उत्साह कमी होत आहे.