Tuesday, April 13, 2010

गणेशोत्सव

गणपती बाप्पा मोरया
गणेशोत्सव :
महाराष्ट्रातील हा फार महत्त्वाचा आणि भव्य प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे. हा उत्सव म्हणजे महाराष्ट्राचे भूषणावह वैशिष्ट्य आहे. भाद्रपद महिन्यातील, शुक्ल पक्षातील चतुर्थी; या तिथीला गणपती या विद्येच्या देवतेची पूजा -अर्चा करून प्रतिष्ठापना करतात. दहा दिवस सजावट करून मूर्ती घरी वा सार्वजनिक ठिकाणी स्थापित केली जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, प्रत्येक गल्ली-बोळात साजरा केला जाणारा हा उत्सव आहे.


घराघरात उत्साहाने मूर्ती आणणे, रोज पूजा करणे, सकाळ - संध्याकाळ आरती म्हणणे असे दहा दिवस किंवा सात दिवस, ५ दिवस किंवा १।। दिवसांसाठीही - त्या त्या घरातील पद्धतीनुसार केले जाते. मोदकांचा नैवैद्य, पंचखाद्य, जास्वंदाची लाल फुले, दूर्वा या गणपतीला आवडणार्‍या गोष्टी त्याला अर्पण केल्या जातात. गावागावातील सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून स्पर्धा, व्याखाने, प्रवचन-कीर्तने, गाण्यांच्या मैफिली, नाटके, लोकनाट्ये आदी सांस्कृतिक कार्यक्रम योजले जातात. पौराणिक, ऐतिहासिक देखावे, तसेच देशभक्तीपर, सामाजिक संदेश देणार्‍या देखाव्यांची सजावट करून समाजाचे मनोरंजन व प्रबोधन केले जाते.


लोकमान्य टिळकांनी या उत्सवाची क्षमता ओळखून लोकांनी एकत्र येऊन गणेशोत्सव सार्वजनिक रीतीने साजरा करावा अशी कल्पना मांडून, त्याची सुरुवात पुण्यातून केली. सुमारे १८९३ च्या दरम्यान घराघरातील गणेशोत्सवाबरोबर सार्वजनिक गणेशोत्सवाची पद्धत सुरू झाली. देश ब्रिटिशांच्या हाती होता. लोकांनी एकत्र येण्यासाठी, जनजागृतीचे कार्यक्रम करण्यासाठी या उत्सवाचा तेव्हा अतिशय उपयोग झाला. भेदभाव विसरून, सर्व जाती-धर्माच्या लोकात एकी असावी, त्यांच्यात उत्साह यावा आणि तेव्हाच विचारप्रवर्तक कार्यक्रम लोकांपुढे होऊन जनजागरणाचे कामही व्हावे यासाठी गणेशोत्सव उपयुक्त ठरला.


 बदलत्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप खूपच बदलले आहे. टिळकांच्या काळात समाजाला जाग आणण्याचे काम या उत्सवाने केले. आजही समाजाचे संघटन - प्रामुख्याने तरुणांचे संघटन - होण्याच्या दृष्टीने हा महाउत्सव पूरक ठरतो. सार्वजनिक गणेश मंडळे ही महाराष्ट्राची शक्ती आहे. या मंडळांच्या माध्यमातून विधायक उपक्रम कार्यान्वित केले जातात. संकटकाळात याच मंडळांचे तरुण कार्यकर्ते समाजाच्या मदतीला धावून जातात. ही मंडळे व हा उत्सव, ह्या सामाजिक कार्यकर्ते व नेतृत्व घडणार्‍या प्रशिक्षण संस्थाच आहेत असे निश्र्चितपणे म्हणता येईल. ध्वनी प्रदूषण, विजेचा अपव्यय, वर्गणीसाठीचे गैरप्रकार, मिरवणुकांतील भांडणे इत्यादी नकारात्मक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न सर्व संबंधित घटक करत असतात. या गोष्टी वगळता हा उत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावरील आकर्षक व पवित्र असा महाउत्सव आहे हे निश्र्चित!

लग्न लग्न म्हणजे काय असतं?

लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं
तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं
तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं
त्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणिवांचं कोंदण असतं
तिच्या खर्चाला त्याच्या खिशाचं आंदण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरुण असतं
तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरुण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी समझोता तर कधी भांडण असतं
तो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं
कपातल्या वादळाला चहाबरोबर संपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी दोन मनांचं मीलन असतं
तर कधी दोन जिवांचं भांडण असतं
एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं
संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
प्रेमाचं ते बंधन असतं
घराचं ते घरपण असतं
विधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं!

नातं


तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं
तरी उनं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं..

तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटु लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात..

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती..

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपुन ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवु नयेत म्हणुन
काळजाच्या तिजोरीत लपुन ठेवतो..

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असचं राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील..

मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतुन
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात..