Friday, April 2, 2010

अर्नाळा



किल्ल्याचे इतिहासाथिल  महत्त्व :
चारही बाजूने पाणी असणारा अर्नाळा हा जलदुर्ग गुजरातचा सुलतान महमुद बेगडा याने १५१६ मध्ये बांधला. १५३० मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकून अनेक नवीन बांधकामे केली. १७३७ मध्ये, सुमारे दोनशे वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बांधनी केली. १८१७ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

गडावरील ठिकाणे:
अर्नाळा किल्ला चौकोनी असुन सुमारे दहा मीटर उंचीची अखंड व मजबुत तटबंदी या किल्ल्याचे संरक्षण करते. तटबंदीमध्ये असलेले बुरुज आजही ठामपणे उभे आहेत. किल्ल्याला तीन दरवाजे असुन मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुस दोन बुलंद बुरुज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असुन दोन्ही बाजुला वाघ व हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजावर दरवाजावर खालील शिलालेख आढळतो:

'बाजीराव अमात्य सुमती आज्ञापले शंकर!
पाश्चात्यासि वधुनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!!'

किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वर व भवानीमातेचे
मंदिर आहे. या शिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या विहिरी सुद्धा आहेत.
किल्ल्याच्या सभोवार लोकांची वस्ती असुन त्यांची शेतीही आहे. किल्ल्याच्या
मुख्य दरवाजाच्या बाहेर कालिकामातेचे मंदिर आहे.

अर्नाल्याच्या तटाची उंची १०  मीटर आहे.तटाची रुंदी तीन मीटर आहे.आत दत्तमंदिर आहे.

एका पोर्तुगीजाने लिहिले आहे-'मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून वसई प्रांत
जिंकून घेतल्यावर लगेच वसई व अर्नाळा येथे आपले आरमार उभारले व विजयदुर्ग
ताब्यात घेतल्यापासून तीन ठिकाणी मराठ्यांचे आरमारी तळ झाले आहेत.'

अर्नाळ्याचा हा कोट पूर्ण बेटावर बांधला नसल्याने बेटावर शत्रू उतरून
कोटाकडे येण्याची शक्यता होती.या बेटावर त्यासाठी टेहालनिसाठी आणि क्वचित
तोफांचा मारा करण्यासाठी एकांडा टेहालणी बुरुज बांधलेला आहे.युरोपच्या
किनारपट्टीवर असे प्रचंड बुरुज आढळतात.अशा बांधकामाला तिकडे 'मोर्ट्रेलो
टोवर' म्हणतात.असे एक आगळेवेगळे बांधकाम अर्नाळा बेटावर आहे.ते
अभ्यासण्यासारखेआहे.

गडावर जाण्याच्या वाटा:
पश्चिम रेल्वेच्या विरारपासून अर्नाळा अंदाजे १० कि.मी. असुन तेथे जाण्यास एस. टी. बस व रिक्षा
यांची सोय आहे. समुद्रकिनार्‍यापासून बोटीने किल्ल्यावर जावे लागते. ही
बोट सकाळी ६.०० ते दुपारी १२.३० व संध्याकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच
आपल्याला किल्ल्यावर घेउन जाते.

No comments:

Post a Comment