Wednesday, April 21, 2010

कसाबचे वकील काझमींची न्यायाधीशांविरोधात याचिका

मुंबई - मुंबई हल्ला खटल्यातून कमी केलेले ऍड. सईद गुलाम अब्बास काझमी यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात सत्र न्या. एम. एल. टहलियानी यांच्याविरोधात स्वतःच्या न्यायालयात अवमान केल्याचा आरोप करणारी याचिका दाखल केली.

काझमी यांना सुमारे साडेचार महिन्यांपूर्वी अतिरिक्त सत्र न्या. टहलियानी यांनी न्यायालयीन कामकाजात असहकार केल्याच्या कारणावरून अतिरेकी अजमल कसाबच्या वकीलपदावरून काढले होते. या वेळी खटला अंतिम टप्यात होता आणि सर्व साक्षीदारांची जबानीही पूर्ण झाली होती. अभियोग पक्षाने दाखल केलेली सुमारे 354 प्रतिज्ञापत्रे सर्वसाधारण साक्षीदारांची नसल्याचा दावा काझमी यांनी केला होता. या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे अवधी मागितला; परंतु हा दावा अमान्य करताना काझमी कामकाजाशी असहकार करीत आहेत, असा ठपका न्यायालयाने ठेवला होता. ज्या प्रकारे व ज्या कारणांमुळे आपल्याला काढून टाकण्यात आले आहे, त्यामुळे न्या. टहलियानी यांनी स्वतःच्याच न्यायालयाचा अवमान केला आहे, असे काझमी यांचे म्हणणे आहे. न्यायालयीन अवमान याचिकेच्या कलम 12 नुसार याची दखल उच्च न्यायालयाने स्वतःहून घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी काझमी यांनी केली. सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकिलांनी केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजीबाबतही त्यांनी याचिकेत नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतही न्यायालयाने कोणतीही कारवाई केली नाही, असे काझमी म्हणतात. या याचिकेमुळे खटल्याच्या कामकाजावर परिणाम व्हावा किंवा कोणत्याही आरोपीला याचा लाभ मिळावा, अशी आपली इच्छा नसल्याचेही त्यांनी याचिकेत स्पष्ट केले आहे. याचिकेबरोबरच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवा आणि वकिलांच्या अन्य संघटनांकडे व मुख्य न्यायाधीशांकडेही काझमी यांनी निवेदन दिले आहे



No comments:

Post a Comment