Wednesday, April 21, 2010

रिलायन्स-टाटामध्ये सुरू नळावरचे भांडण!

मुंबई - आपल्या वीजग्राहकांसाठी विजेची तरतूद करणे "रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर'ला जमत नसेल, तर मुंबई उपनगरातील त्यांचे वीजग्राहक व वीज वितरण यंत्रणा आमच्याकडे सोपवावी, अशी मागणी "टाटा पॉवर'ने केल्यानंतर, यापेक्षा "टाटा पॉवर'चे मुंबईला वीज पुरविणारे वीजनिर्मिती प्रकल्प आमच्याकडे सोपवा, अशी मागणी रिलायन्सने राज्य सरकारकडे केली आहे. त्यातून आता "टाटा-रिलायन्स' वादाला नळावरच्या भांडणाचे स्वरूप येत असल्याचे चित्र आहे.

मुंबई उपनगरातील ग्राहकांसाठी विजेची तरतूद करण्याची जबाबदारी पार पाडण्यात रिलायन्स अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत त्यांची यंत्रणा आमच्याकडे सोपवा. त्याचा योग्य मोबदला देऊ, अशी मागणी "टाटा पॉवर'ने राज्य सरकारकडे केली आहे. त्यावर आम्ही मुंबई उपनगरात वीज वितरण सेवा देतच आहोत. त्यामुळे मुंबईला वीजपुरवठ्यासाठी ट्रॉम्बे येथे कार्यरत असलेला टाटा पॉवरचा औष्णिक वीज प्रकल्प आणि रायगड जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्प आमच्याकडे सोपवा. आम्ही त्याचा योग्य मोबदला देऊ, असे प्रति आव्हान देणारी मागणी रिलायन्सने राज्य सरकारकडे केली आहे.

टाटाच्या मागणीला कसलाही कायदेशीर आधार नाही, असेही रिलायन्सने म्हटले आहे; पण त्याचवेळी टाटाच्या वीज प्रकल्पांना सोपविण्याच्या मागणीला कोणता आधार आहे, हे मात्र रिलायन्सने स्पष्ट केलेले नाही.

रिलायन्सचा वीजपुरवठा बंद करण्याची नोटीस टाटाने बजावल्यापासून दोन्ही कंपन्यांत जोरदार वाद पेटला. त्यात राज्य सरकारने हस्तक्षेप करीत तूर्तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर आता "टाटा-रिलायन्स'मधील वाद हातघाईवर आला आहे. या वादात आपल्या खिशावर महाग विजेचा बोजा पडणार नाही, यासाठी राज्य सरकार काही करते काय, याकडे मुंबई व उपनगरातील वीजग्राहकांचे लक्ष आहे.



वार्तास्त्रोत

No comments:

Post a Comment