Tuesday, April 27, 2010

गहू, दादरचे भाव तेजीतच!

जळगाव - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हंगाम संपण्याच्या तोंडावर दाखल झालेल्या गहू व दादरच्या भावामध्ये तेजी दिसून आली आहे. उशिरा काढणी झालेल्या धान्यालाही मनाजोगते भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना खूपच दिलासा मिळाला आहे.

बाजारात सध्या गहू, दादर, हरभरा यांसारखा भुसार शेतमाल वगळता इतर मालाची आवक नगण्यच आहे. गव्हाची आवक 241 क्‍विंटल झालेली असली तरी ती गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत काहीशी मंदावल्याचे दिसून आले आहे; परंतु तिच्या कमाल दरात प्रतिक्‍विंटलला 100 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळेच गहू बाजारात 1200 ते 1575 रुपयांना विकला गेला. ही स्थिती दादरच्या व्यवहारातही दिसून आली. दादरसुद्धा 200 क्‍विंटलचा टप्पा पार करीत 203 क्‍विंटलपर्यंत पोचली. दादरच्या किमान व कमाल दरात प्रत्येकी 200 रुपयांची भरीव वाढ झाल्याने 1265 ते 1411 रुपयांची मागणी राहिली. हरभऱ्याच्या चाफा, काबुली व मॅक्‍सिको या वाणांची विक्री सुरू आहे. जळगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी उशिरा मळणी केलेला हा शेतमाल बाजारात आणताच विशेषतः चाफाचे दर वधारले. त्याच्या कमाल दरात 150 रुपयांनी, तर काबुलीच्या कमाल दरात तब्बल 200 रुपयांनी वाढ झाली. चाफा (1790 ते 2175 रुपये) व काबुलीची (2650 ते 2820 रुपये) अनुक्रमे 16 व 92 क्‍विंटल आवक झाली. मॅक्‍सिकोची आवकही 10 क्‍विंटल होती. जिल्ह्यात या वाणाला मोठी पसंती असल्याने तिला मागणीही मोठी असते. मॅक्‍सिकोने प्रतिक्‍विंटलला 3100 ते 3700 रुपयांचा दर पदरात पाडून घेतला. अर्थात, मागणीचा रेटा लक्षात घेता हरभऱ्याची एकूण आवक तशी तुरळकच राहिली. त्यामुळेच दरात वाढ झाल्याने विक्रीसाठी हरभरा बाजारात आणलेले शेतकरी आनदांत दिसले. तूर (35 क्‍विंटल) व बाजरीची (19 क्विंटल) आवक मात्र अत्यंत अल्प होती. तूर व बाजरीचे दर मात्र चांगले होते. गुळाची आवक 701 रवे होती. अर्थात, बहुतांश गूळ पश्‍चिम महाराष्ट्रातूनच आलेला होता.



No comments:

Post a Comment