Friday, April 2, 2010

महाबळेश्वर

महाबळेश्वर -
पावसाळ्यातल्या महाबळेश्वरला एक स्वभाव आहे. गुढ भासतं ते या काळात. सगळ्या आसमंताला गुरफटुन टाकणारी ढगाची घोंगडी, लहरी पाउस, शेवाळाच्या झिप-या पिंजारलेली निष्पर्ण झाडं. महाबळेश्वर मोठं ‘ऍटमॉस्फेरीक’ असतं. ग्रेसच्या कवितेसारखं रहस्यमय, आकर्षित करणारं, स्वयंमग्न आणि लिरिकल!

सातारा जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ४५०० फूट उंचीवरील थंड हवेचे हे ठिकाण म्हणजे आरोग्य रक्षणाची इंग्रजांची सोय असलेले ठिकाण होते.

सातार्‍याचे महाराज प्रतापसिंह यांनी १८१८ ते १८३० दरम्यान महाबळेश्र्वर हे आरोग्यवृद्धीसाठी विकसित करण्याचे ठरवले. जॉन माल्कम हे तेव्हाचे गव्हर्नर १८२८ मध्ये महाबळेश्वरला भेट देऊन गेले. तत्कालीन ब्रिटिश अधिकारी लॉडविक यांनी या स्थानाचा ‘थंड हवेचे ठिकाण’ म्हणून नियोजित विकास केला. त्याआधी सर चार्लस्, मॅलेट हेदेखील महाबळेश्र्वरला येऊन गेले होते असे उल्लेख आढळतात.


महाबळेश्वर पाहताना बॉम्बे पॉइंट, ऑर्थर सीट, केटस् पॉईंट, लॉडविक - विल्सन, एलफिस्टन पॉईंट्स, वेण्णा लेक, लिंगमळा धबधबा, तापोळा, जवळचे श्रीक्षेत्र महाबळेश्वर, येथील महादेवाचे मंदिर ही ठिकाणे महत्त्वाची! श्री क्षेत्र महाबळेश्वर येथूनच कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री या पाच नद्या उगम पावतात. या स्थानाला पंचगंगा असेही म्हटले जाते.



वेण्णा लेक 

उत्तम रस्ते, दाट झाडी, बागा, फुला-फळांच्या रोपवाटिका यामुळे महाबळेश्र्वर अनेकांचे आवडीचे थंड हवेचे ठिकाण आहे. जॅम-जेली, सरबते, मध, चणे, स्ट्रॉबेरी यांसाठीही महाबळेश्र्वर प्रसिद्ध आहे. राहण्याच्या सोयी, विविध प्रकारच्या- स्तरांच्या हॉटेल्सची मुबलक सोय यामुळे उन्हाळ्यात आणि सुट्टीत महाबळेश्वर गजबजून जाते.


इ. स. १८३४ ते १८६४ या दरम्यान महाबळेश्वरमध्ये चीनी-मलाई कैदी तुरुंग होता. सुमारे १२० कैद्यांसाठीचा तुरुंग येथे होता. स्ट्रॉबेरी लागवड, बांबूचे विणकाम, मुळ्याची - गाजराची लागवड अशी कामे कैद्यांकडून करून घेतली जात. कैदी कधी कधी तुरुंगातून सुटल्यावर परत न जाता महाबळेश्र्वर मध्येच राहू लागले, असेही झाले.



उंच कडे, खोल दर्‍या, दाट जंगले, थंड-स्वच्छ हवा आणि नीरव शांतता यांचा सुंदर अनुभव सह्याद्रीच्या रांगेतील या स्थानामध्ये मिळतो. परिसरातल्या एका गावाचे ग्रामदैवत महाबळी आहे. या महाबळीचे मंदिर यादवकाळात यादव राजांनी बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याची नोंद इतिहासात आढळते. या ग्रामदैवतावरूनच या भागाला महाबळेश्वर असे नाव देण्यात आले, असे म्हटले जाते. अनेक वैशिष्ट्यांमुळे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील पर्यटक महाबळेश्वरला वारंवार भेट देतात

No comments:

Post a Comment