आषाढ महिना म्हणजे महाराष्ट्रातील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा पंढरपूरच्या वारीचा काळ असतो. आषाढी एकादाशीच्या दिवशी अनेक संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचतात. त्यांसोबत लक्षावधी लोक अनेक दिंड्यातून पायी चालत, विठोबाचे वारकरी म्हणून मोठ्या श्रद्धेने पंढरीला पोहोचतात.
वारकर्यांत जात, पंथ, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच असा जराही भेदभाव नसतो. इसवी सन १२९१ मध्ये आषाढी एकादशीला आळंदीहून पंढरपूरला जाण्यासाठी पहिली दिंडी निघाली होती असे म्हटले जाते. या वारीसाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यांतूनही विठ्ठलभक्त नियमितपणे दिंडीत सामील होतात. वारकरी लाखोंच्या संख्येने विठ्ठलनामाचा गजर, भजन- प्रवचन-कीर्तन करत पायी चालतात.
असंख्य तरुणही त्यात हौसेने व भक्तिभावाने सामील होतात. परदेशी लोकही मुद्दाम या सुमाराला ही विठ्ठलभक्तीची वारी पाहण्यासाठी भारतात येतात आणि या अनोख्या परंपरेचा अनुभव घेतात.
गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गंध-टिळा-बुक्का आणि तोंडाने विठुनामाचा गजर करणारे हे वारकरी खांद्यावर पताका, हातात टाळ, डोक्यावर तुळस घेऊनही चालतात. अनेकांच्या गळ्यात मृदंगही असतो. वर्षानुवर्षे वारीला जाणारे लाखो लोक निग्रहाने चालतात, वाटेत होईल तशी विश्रांती घेतात, मिळेल ते जेवण-खाण घेतात. वारीचे, विविध पालख्यांचे प्रवास-निवास-भोजन यांचे वेळापत्रक, व्यवस्थापन हाही एक अनुभवण्याचा विषय आहे. आषाढातील ही एकादशी उपवास करून घरोघरी साजरी होते. पावसाळ्याची सुरुवात असल्याने ताजी रताळी, नवा बटाटा, खजूर, फळे, वर्याचे तांदूळ, खिचडी असे विविध उपवासाचे पदार्थ या दिवशी ग्रहण केले जातात.
या एकादशीसाठी आळंदीहून संत ज्ञानेश्र्वरांची, देहूतून संत तुकाराम, त्र्यंबकेश्र्वरहून संत निवृत्तीनाथ, सासवडहून सोपान देवांची, पैठणहून संत एकनाथंची, मेहूणहून संत मुक्ताबाईंची, औंढ्या नागनाथहून संत विसोबा खेचरांची, तेरहून संत गोरा कुंभारांची - अशा अनेक पालख्या पंढरपूरला जायला निघतात. संत ज्ञानेश्र्वरांची पालखी आळंदीहून ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला निघते. ती आषाढ शुक्ल दशमीला रात्री पंढरपूरला पाहोचते.
गोष्ट आषाढी एकादशीची :
संपूर्ण वर्षभरामध्ये साधारणता: चोवीस एकाद्शी येतात. प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात एक व शुक्ल पक्षात एक. दोन एकादशी ह्या अधिक मास असल्यास जादा असतात. या सर्वांमध्ये आषाढी व कार्तिकी एकाद्शीस अनंन्य साधारण महत्व आहे. असे मानण्यात येते की, आषाढी एकाद्शीस भगवान श्रीविष्णु हे झोपी जातात म्हणुन त्यांस शयनी एकादशी म्हणतात व कार्तिकी एकादशीस प्रबोधिनी एकाद्शी, कारण या दिवशी भगवान श्रीविष्णु जागे होतात म्हणुन म्हणतात.


एकादशीचे व्रत कसे साजरे करावे यासाठी आपल्या शास्त्रात सांगितले आहे कि सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपल्या कुलदेवते बरोबर विष्णूची पूजा करावी. पुजा करताना तुळशीची एक हजार किंवा एकशे आठ पाने वाहावीत, उपवास करावा. उपवास तुळशीपत्र घेऊन सोडावा. त्यादिवशी रात्री भजन-किर्तन करावे, हरी कथा श्रवण करावी. दुस-या दिवशी सूर्यादयानंतर पारणे सोडावे. ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षात येणा-या एकादशीला भाविक साधा पाण्याचा एक थेंब देखील घेत नाहीत. त्यामुळे या एकादशीला निर्जल एकादशी म्हणतात.
महीना

No comments:
Post a Comment