Thursday, April 22, 2010

समाजकंटकांनी जाळल्या सिडकोत पुन्हा मोटारसायकली


सिडको - येथील त्रिमूर्ती चौक परिसरात काल (ता. 21) रात्री दीडच्या सुमारास समाजकंटकांनी अपार्टमेंटमध्ये लावलेल्या मोटारसायकली पेटवून दिल्या. त्यातील चार मोटारसायकली भस्मसात झाल्या. बाकीच्या वाचविण्यात यश आले. आगीने वीजमीटरसह इमारतीचे नुकसान झाले. या प्रकाराचा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नागरिकांसह रास्ता रोको करून तीव्र शब्दांत निषेध केला. आरोपींना त्वरित अटक न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दीड वर्षापूर्वी सिडको परिसरात मोटारसायकली जाळण्याच्या तीन-चार घटना घडल्या होत्या. त्या वेळी एकाच रात्री चाळीस मोटारसायकली जाळण्यात आल्याने पोलिस यंत्रणा हादरली होती. नंतर तर पोलिसाची हत्या करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली होती. पोलिस आयुक्तांनी कठोर कारवाई करत तेव्हा गुंडांना तडीपारीच्या नोटिसा बजावल्या व राजकीय गुंडांच्याही मुसक्‍या आवळण्यास सुरवात केली होती. मात्र, या गुंडांनी राजकीय दबाव वापरून आयुक्तांच्याच बदलीचा घाट घातला. तत्पूर्वी, त्यांनी वाहने जाळण्याचे प्रकार करून आयुक्तांना अकार्यक्षम ठरविण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, तमाम नाशिककर आयुक्तांच्या पाठीशी उभे राहिल्याने त्यांची बदली रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली होती. राज्यातही हे प्रकरण गाजले होते.

आता नेत्यांच्या मदतीने तडीपारी रद्द करून घेतलेल्या अनेक गुंडांनी गेल्या दोन महिन्यांपासून शहरात पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे. गेल्या महिनाभरात वाहने जाळण्याच्या चार घटना घडल्या आहेत. जेल रोड, नाशिक रोड येथे नुकत्याच अशा घटना घडल्या होत्या. काल (ता. 21) रात्री दीडच्या सुमारास त्रिमूर्ती चौक भागातील अवनीज रेसिडेन्सी या इमारतीखाली लावलेल्या मोटारसायकली पेटविण्यात आल्या. विशेष म्हणजे या इमारतीपासून जवळ असलेल्या भागातच मागील वर्षी चाळीस मोटारसायकली पेटविल्या होत्या. मोटारसायकलींनी पेट घेतल्यानंतर येथे पहिल्या मजल्यावर राहणारे विलास भरीत यांना जाग आली. तथापि, गुंडांनी इमारतीतील फ्लॅटसना बाहेरून कड्या लावल्याने भरीत यांना खाली येता आले नाही. त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे परिसरातील नागरिक धावून आले. पण वर जाण्यासाठी एकच मार्ग असल्यामुळे धावपळ झाली. वाहनांना आग लावल्याने वीजमीटरनेही पेट घेतला होता. नागरिकांनी जीव धोक्‍यात घालून आग विझविली. या वेळी आगीचे लोळ पहिल्या मजल्यापर्यंत पोचल्याने भरीत कुटुंबीयांतील सदस्यांना श्‍वसनाचा त्रास झाला. या घटनेत साहेबराव घुगे (वाहन क्रमांक एम.एच.15-5054), पोपटराव भामरे (एमचएच-15, एएन 157), जितेंद्र सोनवणे (एमएच 19, जी 6546), श्री. पंडयाल (एमएच 15, बीजी 9180) यांच्या मालकीच्या मोटारसायकली जळाल्या. घटनेनंतर पहाटे दोनच्या सुमारास सहाय्यक आयुक्त संदीप पालवे, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धनराज वाळूंजकर, नगरसेवक अण्णा पाटील, सुधाकर बडगुजर, माजी नगरसेवक ऍड. तानाजी जायभावे, कैलास आहिरे यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली.

नागरिकांनी त्यांच्याकडे आरोपींच्या त्वरित अटकेची मागणी केली. घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी केली. एका संशयित मोटारसायकलचा पाठलाग केला. पवननगर भागातून ही
मोटारसायकल (एमएच 15, सीपी 4555) डीजीपीनगर येथे आल्यानंतर या मोटारसायकलवरील तिघांनी मोटारसायकल टाकून पळ काढला. ही मोटारसायकल गुन्ह्यासाठी वापरल्याचा पोलिसांचा संशय आहे. ती चोरीची असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. वाहने चोरून त्याद्वारे मंगळसूत्र चोरणे, लूटमार करणे किंवा जाळपोळीच्या घटनेसाठी वापर करणे ही गुंडांची स्टाइल झाली आहे. पोलिसांनी परिसरात नाकाबंदी लावली असून, गुन्हेगारांचा तपास वेगाने सुरू केला आहे. पोलिसांनी या आरोपींना त्वरित अटक न केल्यास तीव्र
आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment