Wednesday, April 21, 2010

कसाबचे वकील काझमींची न्यायाधीशांविरोधात याचिका

मुंबई - मुंबई हल्ला खटल्यातून कमी केलेले ऍड. सईद गुलाम अब्बास काझमी यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात सत्र न्या. एम. एल. टहलियानी यांच्याविरोधात स्वतःच्या न्यायालयात अवमान केल्याचा आरोप करणारी याचिका दाखल केली.

काझमी यांना सुमारे साडेचार महिन्यांपूर्वी अतिरिक्त सत्र न्या. टहलियानी यांनी न्यायालयीन कामकाजात असहकार केल्याच्या कारणावरून अतिरेकी अजमल कसाबच्या वकीलपदावरून काढले होते. या वेळी खटला अंतिम टप्यात होता आणि सर्व साक्षीदारांची जबानीही पूर्ण झाली होती. अभियोग पक्षाने दाखल केलेली सुमारे 354 प्रतिज्ञापत्रे सर्वसाधारण साक्षीदारांची नसल्याचा दावा काझमी यांनी केला होता. या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे अवधी मागितला; परंतु हा दावा अमान्य करताना काझमी कामकाजाशी असहकार करीत आहेत, असा ठपका न्यायालयाने ठेवला होता. ज्या प्रकारे व ज्या कारणांमुळे आपल्याला काढून टाकण्यात आले आहे, त्यामुळे न्या. टहलियानी यांनी स्वतःच्याच न्यायालयाचा अवमान केला आहे, असे काझमी यांचे म्हणणे आहे. न्यायालयीन अवमान याचिकेच्या कलम 12 नुसार याची दखल उच्च न्यायालयाने स्वतःहून घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी काझमी यांनी केली. सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकिलांनी केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजीबाबतही त्यांनी याचिकेत नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतही न्यायालयाने कोणतीही कारवाई केली नाही, असे काझमी म्हणतात. या याचिकेमुळे खटल्याच्या कामकाजावर परिणाम व्हावा किंवा कोणत्याही आरोपीला याचा लाभ मिळावा, अशी आपली इच्छा नसल्याचेही त्यांनी याचिकेत स्पष्ट केले आहे. याचिकेबरोबरच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवा आणि वकिलांच्या अन्य संघटनांकडे व मुख्य न्यायाधीशांकडेही काझमी यांनी निवेदन दिले आहे



रिलायन्स-टाटामध्ये सुरू नळावरचे भांडण!

मुंबई - आपल्या वीजग्राहकांसाठी विजेची तरतूद करणे "रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर'ला जमत नसेल, तर मुंबई उपनगरातील त्यांचे वीजग्राहक व वीज वितरण यंत्रणा आमच्याकडे सोपवावी, अशी मागणी "टाटा पॉवर'ने केल्यानंतर, यापेक्षा "टाटा पॉवर'चे मुंबईला वीज पुरविणारे वीजनिर्मिती प्रकल्प आमच्याकडे सोपवा, अशी मागणी रिलायन्सने राज्य सरकारकडे केली आहे. त्यातून आता "टाटा-रिलायन्स' वादाला नळावरच्या भांडणाचे स्वरूप येत असल्याचे चित्र आहे.

मुंबई उपनगरातील ग्राहकांसाठी विजेची तरतूद करण्याची जबाबदारी पार पाडण्यात रिलायन्स अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत त्यांची यंत्रणा आमच्याकडे सोपवा. त्याचा योग्य मोबदला देऊ, अशी मागणी "टाटा पॉवर'ने राज्य सरकारकडे केली आहे. त्यावर आम्ही मुंबई उपनगरात वीज वितरण सेवा देतच आहोत. त्यामुळे मुंबईला वीजपुरवठ्यासाठी ट्रॉम्बे येथे कार्यरत असलेला टाटा पॉवरचा औष्णिक वीज प्रकल्प आणि रायगड जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्प आमच्याकडे सोपवा. आम्ही त्याचा योग्य मोबदला देऊ, असे प्रति आव्हान देणारी मागणी रिलायन्सने राज्य सरकारकडे केली आहे.

टाटाच्या मागणीला कसलाही कायदेशीर आधार नाही, असेही रिलायन्सने म्हटले आहे; पण त्याचवेळी टाटाच्या वीज प्रकल्पांना सोपविण्याच्या मागणीला कोणता आधार आहे, हे मात्र रिलायन्सने स्पष्ट केलेले नाही.

रिलायन्सचा वीजपुरवठा बंद करण्याची नोटीस टाटाने बजावल्यापासून दोन्ही कंपन्यांत जोरदार वाद पेटला. त्यात राज्य सरकारने हस्तक्षेप करीत तूर्तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर आता "टाटा-रिलायन्स'मधील वाद हातघाईवर आला आहे. या वादात आपल्या खिशावर महाग विजेचा बोजा पडणार नाही, यासाठी राज्य सरकार काही करते काय, याकडे मुंबई व उपनगरातील वीजग्राहकांचे लक्ष आहे.



वार्तास्त्रोत

Monday, April 19, 2010

महाबळेश्वर-प्रताप गड

महाबळेश्वरचा थंड गारव्यात गम्मत करताना "मनु"

लोह्गढ 

प्रताप गडावरील "सूर्यास्त"


महाबळेश्वर मधील निसर्ग देखावा



महाबळेश्वरमधील बोटिंगचा आनंद लुटताना 




पाचगणीचे आईसक्रीम खाल्लेच पाहिजे 

'प्राध्यापिका' बनून तेजूचा वेश्‍या व्यवसाय

सांगली - डोळ्यांवर ऐटबाज चष्मा, हलका मेकअप, पंजाबी ड्रेस किंवा हलक्‍या रंगाची साडी नेसून ती "प्राध्यापिका' बनून विद्यार्थ्यांच्या वडिलांना भेटायची. वर्तमानपत्रात "टिचर हवी आहे का?' ही जाहिरात वाचून आलेले छोट्या मुलांचे पालक तिच्याशी "फी'ची चर्चा करायला लागायचे. त्यावेळी ती आपला खरा रंग दाखवायची. ती "टिचर' नसून वेश्‍या आहे, हे पालकांच्या लक्षात यायचे, तेव्हा धक्काच बसायचा.

एखादं छंदिष्ट गिऱ्हाईक पकडून ती हळूहळू त्याच्याशी लगट करायची आणि बैठक पक्की व्हायची. मुलाला शिक्षिका शोधायला आलेले काही पालक समतानगर येथील बंगल्यावर पाच-दहा हजारांची उधळण करून रात्र रंगेल करायचे. पोलिस चौकशीत पुढे आलेली तेजू पाटणकर या महिलेबद्दलची ही धक्कादायक माहिती आहे.

समतानगर येथे एक बंगला भाड्याने घेऊन तेथे वेश्‍या व्यवसाय चालविला जायचा. रात्री आठला बंगला उघडला की पहाटे चारपर्यंत तेथे "हाय प्रोफाईल' गिऱ्हाइकांचा राबता असायचा. स्वतः तेजू आणि आणखी चार-पाच महिला, मुली तेथे धंदा करायच्या. हा अड्डा चालविणारा मुख्य दलाल अभिजित जैन उर्फ विक्रम दिलीप पाटील याने पोलिस चौकशीत ही माहिती दिली. भल्याभल्यांना गंडा घालण्याचे "फंडे' त्याने पोलिसांपुढे कथन केले. त्यातून त्याने लाखो रुपये कमावल्याचीही कबुली दिली.

तेजू पाटणकर मूळची इंदोरची आहे. या धंद्यात तिचे आधीही बस्तान होते, मात्र अभिजित जैनशी संपर्क आल्यानंतर तिने "प्राध्यापिका' बनून नव्याने धंदा थाटला. मसाज सेंटरच्या नावाने जाहिरात दिली तर "रिस्क' आहे हे लक्षात आल्यानंतर अभिजित जैनने "टिचर हवी का?' या मथळ्यात जाहिराती देण्यास सुरवात केली. नोकरी, उद्योग, व्यापारामुळे मुलांच्या अभ्यासाकडे हल्ली पालकांचे दुर्लक्ष होते. मुलांना क्‍लासला न्यायचे आणि परत आणायचे यासाठीही त्यांच्याकडे वेळ नाही. त्यामुळे "टिचर' घरी येऊन शिकवण्या घेतात. ही जुनी पद्धत आहे. ती नव्या धंद्यासाठी वापरण्याची शक्कल लढवून जैनने तेजूचा पद्धतशीरपणे वापर करून घेतला. तीही यात मुरत गेली आणि दोघांनी शेकडो लोकांचे खिसे रिकामे केले.
जाहिरातीत "तेजू'चा मोबाईल क्रमांक दिलेला असायचा. मुलांच्या आईचा फोन आला तर ती "बॅच' फुल्ल झालीय, असे उत्तर द्यायची. मुलाच्या वडिलांनी फोन केला तर बराच वेळ माहिती घ्यायची. मुलापेक्षा त्याच्या वडिलांमध्येच तिचा "इंट्रेस्ट' असायचा. ती त्यांना तुम्ही स्वतःच भेटायला या, असे सांगायची. भेटीसाठी एखाद्या हॉटेलची निवड केली जायची. वेळ शक्‍यतो सायंकाळची ठरायची. तिचा तो मेकअप, एकूण लक्षवेधी पेहराव, हावभाव, खाणाखुणा पाहिल्या की समोरील व्यक्तीला साहजिक संशय यायचा. तेव्हा ती त्यांना थेट "बैठकी'ची ऑफर द्यायची. बरेचजण तिच्याकडे आकर्षित व्हायचे. हजार रुपयांना बैठक ठरायची. पैकी तीनशे रुपये अभिजित जैनला आणि सातशे रुपये तेजूला असा सौदा पक्का व्हायचा.
तेजूकडे एका दिवशी पाच-पाच गिऱ्हाईक आल्याची वहीत नोंद आहे. जैन यानेही त्याची कबुली दिली आहे. तिच्यासह आणखी काही महिला व मुली या अड्ड्यावर असायच्या. एकाचवेळी गिऱ्हाइकाची गर्दी झाली तर पर्याय उपलब्ध असायचे. तिच्या या धंद्याचा अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख बाळासाहेब वाघमोडे व त्यांच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला.

तेजू ताब्यातदोन आठवड्यांपूर्वी वेश्‍या अड्ड्यांवर टाकलेल्या छाप्यात तेजू पाटणकरला ताब्यात घेण्यात आले. ती या जाळ्यात अडकली असल्याच्या संशयाने ती "अबला' ठरली. तिची कऱ्हाडच्या सुधारगृहात रवानगी करण्यात आली. आता तिचा खरा रंग पुढे येताच पोलिस तिचा ताबा घेण्यासाठी कऱ्हाडला रवाना झाले. सायंकाळी तिचा ताबा मिळाल्याची माहिती आहे.

रिझर्व्ह बॅंकेचे व्याज दरवाढीचे संकेत

मुंबई - वाढती चलनवाढ आर्थिक विकासाला खीळ घालू शकते, असे मत व्यक्त करतानाच नव्या आर्थिक वर्षाच्या पतधोरणात याबाबत निश्‍चितच उपाययोजना केली जाईल, अशा शब्दांत भारतीय रिझर्व्ह बॅंकेने व्याज दरवाढीचे स्पष्ट संकेत आज दिले.

2009-10 या आर्थिक वर्षातील सूक्ष्म आर्थिक आणि पतधोरण विकासावर आधारित सर्वेक्षण मध्यवर्ती बॅंकेने आज येथे जाहीर केले. या सर्वेक्षणात आर्थिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे आवश्‍यक असल्याचे नमूद करतानाच वाढत्या चलनवाढीवर नियंत्रण मिळविणेही प्राधान्याचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामुळे वाढती महागाई रोखण्यासाठी बाजारातील रोकडतेवर आळा घालण्याच्या दृष्टीने उद्याच्या (ता. 20) वार्षिक पतधोरणामध्ये व्याजदरात वाढ केल्या जाण्याच्या शक्‍यतेला बळकटी मिळाली आहे.

आपल्या सर्वेक्षणात रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे, की अर्थव्यवस्थेच्या वाढीकरिता खासगी क्षेत्रातील मागणी अधिक सक्षम होणे गरजेचे असून, गेल्या काही दिवसांत देशाची चलनवाढ हा चर्चेचा विषय राहिला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी समतोल अशी पावले पतधोरणात उचलली जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अन्नधान्य आणि इंधनाच्या वाढत्या किमतींचा चलनवाढीवर दबाव असल्याचे दिसत असून, कमी मान्सूनचा प्रभाव कृषी उत्पादनावरही होणार असल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत उत्पादनाच्या पुरवठा बाजूने चलनवाढीचा दबाव असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे सर्वेक्षणात म्हटले गेले आहे. चलनवाढीवर येत्या काही महिन्यांमध्ये नियंत्रण मिळविणे शक्‍य होईल, असेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

2008-09 या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 6.7 टक्के होता; तो गेल्या आर्थिक वर्षात 7.2 टक्के राहिला असून, नव्या आर्थिक वर्षाचा 2010-11 चा विकासदर 8.2 टक्के अधोरेखित करण्यात आल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मं. वि. राजाध्यक्ष यांचे निधन

मुंबई - ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष (96) यांचे आज रात्री 8 च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ज्येष्ठ मराठी साहित्यिक डॉ. विजया राजाध्यक्ष यांचे ते पती होत. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रात्री उशिरा शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजाध्यक्ष हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. छातीत कफ झाल्याने त्यांना श्‍वसनास त्रास होत होता. त्यांच्यावर वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना "साहित्य सहवास'मधील घरी आणले. आज रात्री 8 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

राजाध्यक्ष यांचा जन्म 7 जून 1913 रोजी मुंबईत झाला. महाविद्यालयीन जीवनात इंग्रजी साहित्यातील वर्डस्वर्थ पारितोषिक त्यांनी पटकावले होते. "नॅशनल बुक ट्रस्ट'चे विश्‍वस्त, तसेच ज्ञानपीठ पुरस्कार समितीवर त्यांनी काम केले. पाठ्यपुस्तक मंडळाचे मुख्य संपादक पदही त्यांनी भूषविले होते. इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून विद्यार्थिवर्गात ते प्रिय होते. गुजरात कॉलेज, गुजरात इस्माईल युसुफ कॉलेज - मुंबई, राजाराम कॉलेज - कोल्हापूर येथे त्यांनी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केले.

"अभिरुची' मासिकातून त्यांनी लेखन करण्यास सुरुवात केली. "अभिरुची'तील वाद-संवाद हे त्यांचे सदर वाचकप्रिय ठरले. पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर केलेल्या स्फुटलेखनाचे "पुरुषराज अळूरपांडे' हे पुस्तक, तसेच पाच कवी (संपादित), खर्डेघाशी, आकाशभाषिते, शालजोडी, अल्ज्ञान, पंचम, पाक्षिकी, शब्दयात्रा, भाषाविवेक ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कुसुमावती देशपांडे यांच्यासमवेत लिहिलेला "हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर' हा त्यांचा इंग्रजी ग्रंथही प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्र दिनाआधी "मराठी'साठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई - मराठी भाषेच्या प्रश्‍नांकडे गेली अनेक वर्षे दुर्लक्ष झाले आहे. मात्र, राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात याची भरपाई केली जाईल आणि भाषाविकासविषयक मैलाचा दगड ठरतील, असे निर्णय येत्या 1 मेपर्यंत घेतले जातील, अशी आश्‍वासक भूमिका मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज लेखक-पत्रकारांच्या शिष्टमंडळासमोर मांडली. भाषा संचालनालय व इतर शासकीय भाषाविषयक यंत्रणांच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने लेखक-पत्रकारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना आज विधान भवनात भेटले. त्या वेळी त्यांनी ही भूमिका मांडली.

भाषाविषयक यंत्रणा विविध शासकीय यंत्रणांमध्ये वाटली गेल्यामुळे त्यांची फरफट झाली आहे; ती टाळण्यासाठी मराठी राजभाषा मंत्रालयाची स्थापना करावी, अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.