Showing posts with label थोडे काही महाराष्ट्राविषयी. Show all posts
Showing posts with label थोडे काही महाराष्ट्राविषयी. Show all posts

Thursday, April 8, 2010

प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश

बहू असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा..’ या शब्दात कोल्हटकरांनी आपल्या महाराष्ट्राची थोरवी गायिली आहे. अजिंठा, वेरुळ, कार्लेभाजे, कान्हेरी, एलिफंटा, पांडव लेण्यांनी नटलेला; संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गोरोबा, संत जनाबाई, संत गाडगेबाबा, कान्होपात्रांनी मंतरलेला; छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीने तेजाळलेला, संभाजीच्या हौतात्म्याने अजरामर झालेला; माँ जिजाऊच्या आशीर्वादाने बहरलेला; फुले, आंबेडकर, शाहू, आगरकर, सावरकर, टिळक, फडके यांच्या त्याग आणि क्रांतिकार्याने पुनीत झालेला हा महाराष्ट्र. तर मग अशा ह्या आपल्या महाराष्ट्राविषयी थोडा काही जाणून घेऊया

Monday, April 5, 2010

प्राचीन महाराष्ट्र


प्राचीन महाराष्ट्र :
महाराष्ट्राचा इतिहास आणि ‘महाराष्ट्र’ नावाचा उल्लेख शोधण्यासाठी आपणास प्राचीन कालखंडात जावे लागते. नर्मदा नदीच्या उत्तरेस उत्तरापथ किंवा आर्यावर्त आणि दक्षिणेस ‘दक्षिणापथ’ असे म्हणत. चंद्रगुप्त मौर्यांच्या कालखंडातील आर्य चाणक्य उर्फ कौटिल्य यांनी लिहिलेल्या ‘अर्थशास्त्र’ ग्रंथात अश्मक व अपरान्त या देशांचा उल्लेख आहे. अश्मक म्हणजे अजिंठ्याच्या आसपासचा प्रदेश.

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरण गावी एक शिलालेख सापडला आहे. तो चौथ्या शतकातील आहे. या शिलालेखात सेनापती सत्यनाग याने स्वत:ला ‘माहाराष्ट्र’ असे म्हणवून घेतले आहे. पुढच्या कालखंडात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी आपल्या शिष्यांना ‘महाराष्ट्री असावे’ असे सांगतात. 

महाराष्ट्र या नावाबरोबरच महाराष्ट्रातील आद्य मानववस्तीचा शोध आपण घेतला, तर आपणास नव्या संशोधनपद्धतीनुसार मिळालेली माहिती आश्र्चर्यकारक असल्याचे दिसते. नासिक, जोर्वे, नेवासे, चांडोली, सोनगाव, इनामगाव, दायमाबाद, नांदूर, मध्यमेश्वर या ठिकाणच्या उत्खननांमधून व अत्याधुनिक अशा ‘कार्बन-१४’ पद्धतीनुसार पुरातत्त्ववेत्यांनी महाराष्ट्रातील आद्य-मानवाचा कालखंड इ.स. पूर्वी सुमारे ५ लक्ष ते ३० लक्ष वर्षे मानला आहे. उपरोक्त व नद्यांच्या काठी झालेल्या उत्खननांतून असा निष्कर्ष इतिहासतज्ज्ञांनी काढला आहे की, आदि-अश्मयुगीन मानव महाराष्ट्रात एक ते दीड लाख वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या परिसरात वावरत असावा. पुढे वसाहती वाढत गेल्या. महाराष्ट्रात बाहेरुन-विशेषत: उत्तरेतून राजांचे प्रतिनिधी म्हणून लष्करी वेशाचे लोक येऊ लागले. मूळचे नागरिक आणि बाहेरुन आलेले यांच्यात सुरुवातीला संघर्ष व नंतर समन्वय झाला.
वरील कालखंडानंतर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाकडे आपण वळलो, तर आपणास महाराष्ट्रातील ठळक जाणवणार्‍या सत्ता पुढीलप्रमाणे दिसतात. सातवाहन घराण्यातील श्री सातकर्णी, गौतमीपुत्र सातकर्णी, वाकटकांचा विंध्यशक्ती, द्वितीय प्रवरसेन, चालुक्यांच्या घराण्यातील श्रेष्ठ असा सत्याश्री पुलकेशी, विक्रमादित्य, राष्ट्रकुटांपैकी मानांक, दंतिदुर्ग, प्रथम कृष्ण, ध्रुवराज, गोमंतकातील कदंब घराण्यातील अनंतदेव, अपरादित्य, मध्ययुगीन अशा यादव घराण्यातील द्रुढव्रत, भिल्लम, रामदेवराय या राजांनी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचे योगदान दिले. या राजांच्या ऐतिहासिक योगदानाला तोड नाही.

Saturday, April 3, 2010

संस्कृतीची जोपासना

महाराष्ट्राची म्हणून एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. संस्कृती म्हणजे जगण्यासाठीची मूल्ये, आचरणाचे नियम, रूढी, चाली-रीती, व्यवहार, आपली भाषा, सण, उत्सव, इतिहास, भौगोलिक परिस्थिती, थोर व्यक्ती, परंपरा यांतून संस्कृती प्रत्येक नव्या पिढीकडे पोहोचते. बदलत्या काळाप्रमाणे येणार्‍या पिढीला त्यात काही फेरफार करावे लागतात, पण वागण्याचे नियम-मूल्ये यात मात्र मोठे बदल होत नाहीत. सण-उत्सव, प्रथा, परंपरा या एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला वारशाने समजतात. त्याविषयीचे वाचन, अभ्यास औपचारिकपणे सर्व जण करत नसले, तरी मौखिक परंपरेने, अनुकरणाने, निरीक्षणाने त्या वर्षानुवर्षे सुरूच राहतात.

मुख्यत: शेतीप्रधान संस्कृती व ग्रामीण भागात वास्तव्य करणारी लोकसंख्या महाराष्ट्रात अधिक आहे. निसर्गाशी अगदी जवळचा संबंध असणारे कष्टकरी अत्यंत देवभोळे, श्रद्धाळू, पापभिरू असल्याने बर्‍याच व्रत-वैकल्यांत आणि उपचारांत समाधान व आनंद मानणारे आहेत. तसेच शिक्षित समाजही रूढी, परंपरा, सण-उत्सव यात कसा वेळ देतो, का वेळ देतो हेही समजून घेण्याजोगे आहे.

दैनंदिन कामातून थोडे वेगळे होऊन; नातलग, शेजारी, गावकरी, सहकारी यांच्या सोबतीने एकत्र येऊन आनंद साजरा करणे, या हेतूने महाराष्ट्रात अनेक उत्सव, सण साजरे केले जातात. हवामान, ऋतू आणि त्या-त्या ऋतूत असणारी फळे, फुले, झाडे, त्यांचा औषधी उपयोग याचा अभ्यास करून पूर्वापार हे सण-उत्सव, व्रतं पाळली जातात. आयुर्वेद-औषधी शास्त्र हे अतिशय प्रगत शास्त्र म्हणून उपयोगात आणले जात होते असेही त्यावरून लक्षात येते. वनौषधी, फुले ऋतूमानाप्रमाणे उगवतात व कोमेजतात. आपल्या सणावारात ऋतूमानाप्रमाणे येणार्‍या पिकांचाही फार विचार केलेला आहे असे लक्षात येते.

आचरणाचे नियम हेदेखील त्यामुळे निसर्गातील बदलांचा विचार करून ठरवलेले आहेत. आपल्या आहारात कोणते घटक केव्हा यावेत, कसे यावेत याचा अभ्यास पूर्वीपासून होत असावा. त्यामुळे बदलत्या हवेनुसार सणांना करण्याचे पदार्थही त्यादृष्टीने ठरवलेले आहेत. या अर्थाने खाद्यसंस्कृतीही सण-उत्सवांशी जोडल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

पारंपरिक पद्धतीने आज सण सर्वत्र साजरे होत नाहीत. त्यात व्यावहारिक अडचणीही आहेत. तरीही महाराष्ट्रात सण-उत्सव धार्मिक पद्धतीने साजरे करणे, लोकांनी एकत्र येण्यासाठीचे माध्यम म्हणून आजही सुरू आहे. महाराष्ट्रातून इतर राज्यांत, देशांत जाणारे लोक त्यांच्यासोबत त्या पद्धती घेऊन जातात. त्यामुळे अनेक मराठी सण-उत्सव जगाच्या कानाकोपर्‍यातही साजरे होतात असे दिसते.

जाती-धर्मात विभागलेल्या आपल्या समाजाला भेद-भाव विसरून एकत्र येण्यासाठी काही उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरे करण्याची पद्धत आपल्या समाजसुधारकांनी शिकवली. उत्सवांचा समाज प्रबोधन करण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम म्हणून वापर समाजसुधारकांनी केला.

काही धार्मिक चालीरिती लोकांत भेदभाव करणार्‍या, अंधश्रद्धा पसरवणार्‍या असल्याचे पाहून संतांनी एक प्रबोधनाची चळवळ महाराष्ट्रात सुरू केली. संत ज्ञानेश्र्वर,
संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत गोरोबा,संत चोखामेळा, संत मुक्ताबाई,संत जनाबाई, समर्थ रामदास यांनी समाजाला एकत्र येण्याची, भेदभाव विसरण्याची, समानतेची शिकवण दिली. काही उत्सव सामान्य जनतेला चांगल्या मार्गाने जगण्याची शिकवण देण्यासाठी, नीतीनियमांनी समाजाला बांधून ठेवण्यासाठीही सुरू केले. शिक्षणाने, विज्ञानाच्या प्रसार-प्रचारामुळे काही सण, उत्सव, चालीरिती यांचे स्वरूप आधुनिक काळात बदलत आहे. त्यात असणार्‍या अंधश्रद्धांना वगळून सण वा उत्सव साजरे व्हावेत, व्रतं पाळली जावीत हीच संतांचीही प्रबोधनाची चळवळ होती.

महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संतांमुळे आजही अनेक राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील सांस्कृतिक वातावरण निराळे आहे. त्याला अध्यात्माची, तत्त्वज्ञानाची, इतिहासाची आणि मानवजातीच्या कल्याणाची सांगड घालून आपले सण-उत्सव साजरे करण्याची प्रथा आहे. मानवाच्या कल्याणाचे, त्याच्या प्रगतीचे बीज घराघरात पोहोचवण्याचे काम त्यामुळे संस्कृतीच्या माध्यमातून होते असे दिसते.

‘संस्कृती’ या शब्दाला आलेला सध्याचा अर्थ फार वरवरपणे व्यवहारात वापरला जातो आहे. पण मुख्यत: उन्नत समाजासाठी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होण्यासाठी आणि व्यापक समाजहितासाठी असलेले आचार-विचार-विहाराचे व्यक्तीसाठीचे नियम, शिष्टाचार यांसाठी वापरलेला शब्द म्हणजे ‘संस्कृती’.

आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत आपले सणवार, व्रतं आणि उत्सवदेखील ऋतुमानाप्रमाणे - सूर्य-चंद्र-ग्रहस्थितीच्या अनुसार -ठरलेले आहेत. मराठी दिनदर्शिकेनुसार ग्रहस्थितीप्रमाणे - पृथ्वी आणि इतर ग्रहांच्या स्थानाप्रमाणे - कालमापनाच्या पद्धती ठरल्या. त्याप्रमाणे तिथीला मराठी दिनदर्शिकेत महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक सण-दिवस हे तिथीनुसार ठरलेले दिवस - तेही निसर्गावर आधारित असेच आहेत.


भारतात कालमापनासाठी फार पूर्वापार चालत आलेली पंचांग पद्धती आजही उपयोगात आणली जाते. धर्मशास्त्रांसंदर्भातील ग्रंथांतून त्याबद्दलचे संदर्भ सापडतात. सण-उत्सव हे त्या पंचांगानुसार ठरवण्याची प्राचीन पद्धत आहे. पूर्वी मोजक्या शिक्षित - ब्राह्मण जातीच्या लोकांपुरते असलेले हे ज्ञान आता शास्त्ररूपात, गणिती पद्धतीने सर्वच लोकांसाठी खुले आहे. त्यानुसार सण-उत्सव ठरून ते छापील पद्धतीने सर्वांसाठी उपलब्ध असतात. २७ नक्षत्रे, १५ तिथी, ७ वार, २७ योग असे पंचांग भारतात इसवीसनपूर्व ४०० वर्षांपासून प्रचलित असावे असे संदर्भ मिळतात. 

Wednesday, March 31, 2010

मुख्य शहरे

    * मुंबई - मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मुंबईत परप्रांतीयांचे लोंढे कायम येत असतात कारण येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

    * पुणे - शिवपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. हे शहर शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहे. येथील शैक्षणिक संस्थांमध्ये शिकण्यास भारत व जगभरचे विद्यार्थी येतात.

    * नागपूर - विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर असलेले नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते.

    * औरंगाबाद - मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ येथे आहे. मराठवाडा विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे.

    * नाशिक - हे उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक शहर आहे. दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो.
    * कोल्हापूर- शिवकालापासून व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर महालक्ष्मी अंबाबाई मंदिरासाठी हे प्रसिद्ध आहे.

    * सोलापूर- दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर. अस्ताला गेलेल्या कापड गिरण्यांसाठी प्रसिध्द. येथिल सिध्देश्वराचे मंदिर प्रसिध्द.

वाहतूक व्यवस्था

भारतीय रेल्वेचे जाळे राज्यभर आहे व लांबच्या प्रवासाकरीता रेल्वे हे सोयीचे साधन आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक
भागांना मध्य रेल्वे सेवा पुरवते. कोकण भागात कोकण रेल्वे तर इतर काही भागांना पश्चिम रेल्वे सेवा देते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एस.टी) सेवा बहुतेक शहर व खेड्यात उपलब्ध असते. एस.टी.चे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. विशेषत: ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत. अनेक शहरात एस.टी. बरोबरच खाजगी गाड्यादेखिल सेवा पुरवतात.

महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईत आहे. नागपूर व पुणे विमानतळांवरुन देशांतर्गत तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखिल होतात. औरंगाबाद, रत्नागिरी, कोल्हापूर व सोलापूर येथेही राष्ट्रीय विमानतळ आहेत. मुंबईतल्या बंदरांपासून कोकण किनारपट्टीवरील इतर बंदरात फेरी-सेवा (समुद्रावरून वाहतूक) होत असते. शहरी भागात ३ आसनी रिक्षा तर उपनगरात सहाआसनी रिक्षा लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात महामार्गांचे मोठे जाळे आहे. मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वात पहिला टोलमार्ग आहे. मुंबई-नागपूर दरम्यानच्या या प्रतीच्या मार्गाचे काम सुरू आहे. मुंबई, न्हावा-शेवा व रत्नागिरी ही महाराष्ट्रातील ३ मोठी बंदरे आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग

महाराष्ट्रातील लोकजीवन

महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २००१च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ९,६७,५२,२४७ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारतातील दुस-या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणा-यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३२२.५/१ कि.मी.२ इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.०३ कोटी पुरुष व ४.६४ कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९२२ महिला इतका आहे. ७७.२७% (पु-८६.२%, स्त्रि-६७.५%) लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता.

मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्याचबरोबर हिंदी व इंग्लिश शहरी भागात बोलली जाते. उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात अहिराणी तर दक्षिण कोकणात मालवणी या मराठीच्या बोलीभाषा बोलल्या जातात. दख्खनच्या देश भागात 'देशी' व विदर्भात 'व-हाडी' या बोलीभाषा अस्तित्वात आहेत.

राज्यात ८०.२% हिंदू, १०.६% मुस्लिम, ६% बौद्ध, १.३% जैन व १% ख्रिश्चन धर्मीय जनता आहे. काही प्रमाणार ज्यू व पारशी धर्मीय देखिल आहेत.

महाराष्ट्राचे भौगोलिक महत्व

महाराष्ट्र  (अर्थ:महान राष्ट्र) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. भारताच्या पश्चिम-मध्य भागात असलेल्या महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. मुंबई, देशातील सर्वात मोठे शहर, हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. तर नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे अग्रणी राज्य आहे.


महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ. कि. मी. इतके आहे.
विस्तार - महाराष्ट्राची पुर्व-पश्र्चिम जास्तीत जास्त लांबी ८०० कि. मी. आणि उत्तर-दक्षिण जास्तीत जास्त लांबी ७०० कि.मी. आहे.

क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा राजस्थान, मध्यप्रदेशनंतर भारतात तिसरा क्रमांक लागतो. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी (३२,८७,२६३ चौ. कि.मी.) ९.३६ % इतका हिस्सा महाराष्ट्राने व्यापला आहे.

महाराष्ट्राच्या वायव्येस-गुजरात राज्य, दादरा व नगर हवेली , उत्तरेला -मध्य प्रदेश, पूर्वेस - छत्तीसगड, आग्नेयेस - आंध्रप्रदेश, दक्षिणेस - कर्नाटक आणि अगदी दक्षिणेस - गोवा राज्य आहे. राज्याच्या पश्र्चिम सीमेलगत अरबी महासागर पसरलेला आहे.